प्रत्यक्ष मतदानापेक्षा ४५९ जास्त मते मोजली; राजू शेट्टींचा आरोप

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील हातकलंगले लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांची खासदारकीची हॅटट्रिक रोखत शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. तब्बल लाखाच्या मते त्यांनी राजू शेट्टी यांना धूळ चारत त्यांनी हा विजय मिळवला. परंतु राजू शेट्टी यांनी आता निवडणूक आयोगाकडे धाव घेत लेखी तक्रार केली आहे. मतदार संघात एकूण मतांपेक्षा जास्त मते मोजण्याचा प्रकार उघडकीस आल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकांच्या निकालात कोल्हापुर आणि हातकणंगले मतदारसंघाचा निकाल या ठिकाणच्या राजकारणात मोठा बदल करणारा ठरला. सलग 2 वर्ष खासदार असलेले राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांनी 95 हजार 765 मतांनी पराभव केला आहे. परंतु आता राजू शेट्टी यांच्या मतदार संघात एकूण मतांपेक्षा जास्त मते मोजण्याचा प्रकार उघड झाल्याच सांगण्यात येत आहे.

राजू शेट्टींच्या मतदार संघात झालेल्या मतदानापेक्षा जास्त मते आढळली आहेत. अशी तक्रार खासदार राजू शेट्टी यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. हातकणंगले मतदारसंघात 12 लाख 45 हजार 797 इतक्या लोकांनी मतदान केले होते. मात्र मतमोजणीच्या दिवशी 12 लाख 46 हजार 256 इतकी मतांची मोजणी झाली आहे. 459 इतकी अधिकची मते आलीत कोठून असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. शेट्टी यांनी मतमोजणीच्या आदल्या दिवशी केंद्रावर दिसून येणाऱ्या वायफाय बाबत आक्षेप घेतला होता. त्यातच आता मतांच्या संख्येत वाढ दिसत असल्याने अनेक शंका उपस्थित होत आहेत. निवडणूक आयोगाने तक्रारीची दखल न घेतल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा शेट्टींनी दिला आहे.

Leave a Comment