काळजाचा थरकाप उडवणारी घटना; पोटदुखीमुळे पाच दिवसाच्या बाळाने फोडला टाहो ; आई-वडिलांकडून चिमुरड्याला बिब्बा गरम करुन चटके

मुंबई : पुरोगामी महाराष्ट्राला लाज आणणारी घटना उघडकीस आली आहे.  पोटदुखीमुळे नवजात बाळ सतत रडत होते. मात्र त्याला दवाखान्यात घेऊन जाण्यापेक्षा जन्मदात्या आई-वडिलांनी त्याच्या पोटावर बिब्याचे चटके देऊन उपाय केल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळमध्ये समोर आला आहे. पाच दिवसांच्या बाळाला बिब्बा गरम करुन चटके देण्यात आले, ज्यात बाळाची प्रकृती आणखी बिघडल्याचे सांगण्यात येत आहे.

घाटंजी तालुक्यातील पारा पीएचसीमध्ये 6 जून रोजी या बाळाचा जन्म झाला. प्रसुती झाल्यानंतर आई आणि बाळाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर बाळाला घरी आणण्यात आले. मात्र घरी आल्यानंतर बाळ एकसारखे रडत होते. त्यातच आई-वडिलांनी बाळाला डॉक्टरांकडे न नेता गावातील ज्येष्ठ मंडळींचा सल्ला घेतला. त्यांनी सांगितल्यानुसार, आई-वडिलांनी अवघ्या पाच दिवसांच्या बाळाच्या पोटावर बिब्बा गरम करुन त्याचे चटके दिले. मात्र या अमानवी आणि अघोरी उपचारामुळे बाळाची प्रकृती सुधारली नाहीच उलट आणखीच चिंताजनक बनली आहे.

यानंतर बाळाला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इथे बाळावर उपचार केले जात आहे. बाळाला जगवण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत. परंतु मन हेलावणाऱ्या या अघोरी प्रकारामुळे ग्रामीण भागात अजूनही असे अघोरी प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे. वारंवार आवाहन आणि जनजागृती करुनही अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने चिंता अधिक वाढली आहे.

अमरावतीमध्ये तीन वर्षांपूर्वी अशाच प्रकाराची घटना घडली होती. आजारी असलेल्या आठ महिन्यांच्या बाळाच्या पोटावर आई-वडिलांनीच गरम विळ्याचे चटके देण्यात आले होते. अंधश्रद्धेतून मांत्रिकाच्या सांगण्यावरुन आई-वडिलांना बाळाच्या पोटावर विळ्याने शंभर चटके दिले. अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटातील चिखलदरा तालुक्यामधल्या बोरदा या अतिदुर्गम आदिवासी गावात धक्कादायक प्रकार समोर आला होता.