nagar | कृषी विभागाचे २६ हजार ३०० हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट

श्रीरामपूर, (शहर प्रतिनिधी)- श्रीरामपूर तालुक्यात सध्या खरीप पेरणीपूर्व मशागतीच्या कामे वेगात सुरू झाली आहे. कृषी विभागानेही खरीप हंगामाची तयारी पूर्ण केली असून, यंदा २६ हजार ३०० हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गेली काही वर्षे सतत अतिवृष्टी, गारपीट आणि दुष्काळ अशा अस्मानी संकटातून बळीराजाने पुन्हा स्वतःला सावरून काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या खरीप हंगामाच्या तयारी सुरू केली आहे.

यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खरिपाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. नांगरणी, वखरणी, खत पसरविणे आदी कामांबरोबरच बी-बियाणे, खते खरेदीसाठी आर्थिक जुळवाजुळव शेतकऱ्यांकडून सुरू आहे.

खरीप हंगामात शेतकऱ्यांना रासायनिक खतांची टंचाई भासू नये, यासाठी ५ हजार २८५ मेट्रिक टन खताचा साठा तालुक्यात उपलब्ध आहे. या खरीप हंगामामध्ये सोयाबीन १६१०० हेक्टर, मका ३६५० हेक्टर, कपाशी ६२३० हेक्टर, भुईमूग १२० हेक्टर, बाजरी २०० हेक्टर अशा पिकांचे नियोजन करण्यात आले आहे. जून महिना सुरू होताच पाऊस झाल्याने राहिलेल्या मशागतीला वेग आला आहे.

सोयाबीनसाठी १६१०० हेक्टर क्षेत्र गृहीत धरण्यात आले आहे. त्यापाठोपाठ कपाशी ६२३० हेक्टर नंतर मका ३६५० हेक्टर क्षेत्र गृहीत धरण्यात आले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत मक्याच्याही क्षेत्रात वाढ होताना दिसत आहे. बाजरी पीकही २०० हेक्टरवर घेतले जाणार आहे.

यंदा खरीप हंगामात ५ हजार २८५ मेट्रिक टन खताचा साठा आहे. शेतकऱ्यांनी कीड रोगाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शेताची खोल नांगरट व बांध स्वच्छ करावेत. अधिकृत विक्रेत्यांकडूनच खते बियाणे खरेदी करून पक्की पावती घ्यावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अविनाश चंदन यांनी केले आहे.

शेतकऱ्यांचा विविध संकटांशी सामना
यंदाचा खरीप बळीराजासाठी चांगला जाईल अशी अपेक्षा आहे. मागील तीन वर्षांपासून शेतकरी राजा अस्मानी संकटाबरोबरच, शेती मालाला नसलेला भाव, खते, बी-बियाणांच्या वाढत्या किमती, मजूर टंचाई बरोबरच वाढलेले मजुरीचे दर अशा विविध संकटांचा सामना करत आहे.