कृषिमंत्री धनंजय मुंडेंनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या 4 मुलींच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी

यवतमाळ | यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या 4 मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. तसेच उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी यांना फोन लावून आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबांना तात्काळ अर्थसहाय्याची मदत देण्याचे निर्देश दिले आहेत.

सविस्तर माहिती अशी की, कृषिमंत्री धनंजय मुंडे हे शुक्रवारी यवतमाळ दौऱ्यावर होते. यवतमाळ जिल्ह्यातील मनोज राठोड व नामदेव वाघमारे या दोन शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यांचे कुटुंबिय मुंडे यांना भेटण्यासाठी यवतमाळमध्ये आले होते. धनंजय मुंडे यांच्याकडे आपली व्यथा मांडत असताना शेतकऱ्याच्या कुटुंबातील महिलांना अश्रू अनावर झाले.

“पती गेला आता चार मुलींचा सांभाळ कसा करणार,” असे म्हणत महिलेने हंबरडा फोडला. शासनाची मिळणारी मदतही अद्याप मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले. तातडीने कृषिमंत्र्यांनी उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी यांना फोन लावून या दोन्ही कुटुंबांना तात्काळ अर्थसहाय्याची मदत देण्याचे निर्देश दिले. तसेच मनोज राठोड यांच्या चारही मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी कृषिमंत्री मुंडे यांनी घेतली.

धनंजय मुंडे यांनी याबाबत फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. ते म्हणाले की, “काल मी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आत्महत्याग्रस्त शेतकरी मनोज राठोड यांच्या कुटुंबातील एक महिला भगिनी मला भेटायला आल्या. त्यांना शासनाकडून मिळणारी मदत तातडीने मिळेल, याची व्यवस्था केली आहे; पण त्यांना चार मुली आहेत, त्या चारही मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी मी घेतली आहे.

सांगायचा उद्देश हा आहे की, आत्महत्या केल्याने फक्त जीवन संपते, प्रश्न सुटत नाहीत उलट ते वाढतात! माझ्या शेतकरी बांधवांना हात जोडून विनंती आहे की असा विचार मनातसुद्धा आणू नका, तुमच्या कोणत्याही अडचणीत मदतीसाठी माझी दारं 24 तास उघडी आहेत.”

 

https://fb.watch/mwRfxBjhyO/?mibextid=Nif5oz