अहमदनगर – आशुतोष काळेंकडून नगरपरिषदेचा भार हलका

कोपरगाव –  कोपरगावकरांना दिलेल्या वचनांची पूर्तता करताना सर्वसामान्य कोपरगावकरांना अपेक्षित असलेला विकास पण करायचा व कोपरगावकरांवर अतिरिक्त कराचा बोजा देखील पडू द्यायचा नाही, अशी दुहेरी भूमिका यशस्वीपणे पार पाडून आ. आशुतोष काळे यांनी आपले राजकीय वजन वापरून कोपरगाव नगरपरिषदेला तब्बल १९ कोटी ६८ लक्ष ६० हजार एवढा निधी नगरविकास विभागाकडून मिळवून दिला आहे.

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी १३१ कोटी २४ लाख निधी ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी दिला होता. मिळालेल्या निधीतून ५ नंबर साठवण तलावाचे काम आजरोजी प्रगतीपथावर आहे. या कामाकडे आ. आशुतोष काळे यांचे बारीक लक्ष असून पुढील वर्षी काम पूर्ण होताच कोपरगावकरांना नियमित व स्वच्छ देण्याचे आ. त्यांनी सांगितले आहे. मात्र ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी निधी देतांना त्यापैकी १५ टक्के निधी म्हणजेच जवळपास २० कोटी निधी हा कोपरगाव नगरपरिषदेला देण्याची अट घालण्यात आली होती. त्यामुळे या २० कोटीचा बोजा सर्वसामान्य कोपरगावकरांवर पडणार होता.

परंतु साठवण तलाव पण करायचा व २० कोटीचा बोजा सर्वसामान्य कोपरगाव करांवर पडू द्यायचा नाही यासाठी आ. आशुतोष काळे मागील तीन वर्षापासून करीत असलेल्या प्रयत्नांना कोपरगावकरांच्या आशीर्वादाने मोठे यश मिळाले. नगरविकास विभागाने कोपरगाव नगरपरिषदेला वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत १९ कोटी ६८ लक्ष ६० हजार एवढा निधी दिला आहे. त्यामुळे कोपरगावकरांचा भार हलका झाल्यामुळे समस्त कोपरगावकरांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

कोपरगावकरांना नवीन वर्षाची भेट
५ नंबर साठवण तलाव वितरण व्यवस्थेसाठी कोपरगाव नगरपरिषदेला द्यावा लागणारा १५ टक्के म्हणजेच जवळपास २० कोटी निधी महायुती शासनाने दिला. कोपरगाव शहराबरोबरच शहरालगत असणाऱ्या विविध उपनगरातील हद्दवाढ झालेल्या भागातील विकासासाठी दिलेला १० कोटी निधी मी करीत असलेला पाठपुरावा, प्रामाणिक प्रयत्न व कोपरगावकरांच्या आशीर्वादाचे फलित असून ही कोपरगावकरांना नवीन वर्षाची भेट असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.