अहमदनगर – उर्वरित पिक विमा धारकांना अग्रीम पिकविमा रक्कम तातडीने द्या   

कोपरगाव  – आ. आशुतोष काळे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे पीकविमा कंपनीला आगाऊ पीकविमा देण्याच्या सूचना कृषी विभागाकडून देण्यात आल्या असून, कोपरगाव मतदारसंघातील अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचा आगाऊ पीकविमा रक्कम मिळाली असून, अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे उर्वरित पीकविमाधारक शेतकऱ्यांना तातडीने आगाऊ पीकविमा रक्कम मिळावी, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

आ. काळे यांनी पत्रात म्हटले आहे की, कोपरगांव विधानसभा मतदारसंघातील ४५ हजार ६२ शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीकविमा घेतला असून, एकूण ६४ हजार २३ शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केलेले होते. विमा कंपनीच्या निकषानुसार नुकसान होऊनदेखील शेतकऱ्यांना आगाऊ पीकविम्याची रक्कम मिळालेली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांना ही रक्कम लवकरात लवकर मिळावी यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे, कृषी विभागाचे मुख्य सचिव अनुप कुमार व जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यातून पीकविमा कंपनीने प्राथमिक स्वरूपात सोयाबीन पिकाचे आगाऊ पीकविमा रक्कम वाटप केली असून, यामध्ये काही सोयाबीन पीकविमाधारक शेतकऱ्यांना ही रक्कम मिळालेली नाही.

एकूण पीकविमाधारकांपैकी सोयाबीन (१० हजार), मका (६ हजार), बाजरी (७४०), कांदा (४३५), कपाशी (३ हजार ८८८) व तूर (२१५) अशा एकूण २१ हजार २७८ शेतकऱ्यांना आगाऊ पीकविमा रक्कम अद्याप मिळालेली नाही. मतदारसंघातील कोपरगाव, सुरेगाव, दहेगाव, रवंदे, पोहेगाव व पुणतांबा मंडलामध्ये जवळपास दीड महिना पावसाचा खंड पडल्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान होऊन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांना पीकविम्याच्या माध्यमातून काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामात झालेल्या नुकसानीची पर्वा न करता उसनवार व कर्ज घेऊन रब्बी हंगामातील पिके उभी केली असून, रब्बी हंगामातील पिकांच्या पुढील खर्चाला पीकविमा रकमेचा हातभार लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा विचार करून उर्वरित शेतकऱ्यांना तातडीने आगाऊ पीकविमा रक्कम देण्याबाबत पीकविमा कंपनीला आदेश द्यावेत, अशी मागणी आ. काळे यांनी पत्रात केली आहे.