पिंपरी | आकुर्डी-चिखली मार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात

चिखली, (वार्ताहर) – शहरातील सुस्थितीतील रस्ते तोडून प्रशस्त पदपथ, सायकल मार्ग तयार केले जात आहेत. कोट्यवधींचा खर्च करून तयार केलेले पदपथ विक्रेते, दुकानदारांच्या साहित्यांनी व्यापलेले आहेत. आकुर्डी-चिखली मार्गावरील पदपथांना अतिक्रमणांचा विळखा पडला आहे.

पादचार्‍यांना सेवा रस्त्यावरूनच चालावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोट्यवधींचा खर्च करूनही पादचारी रस्त्यावरच असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे अतिक्रमणांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात रस्ते, पदपथ विकसित करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यासाठी सुस्थितीतील रस्ते तोडून नव्याने तयार केले जात आहेत. अधिक रुंदीचे पदपथ बनवून सायकल मार्गाची भर घातली जात आहे. मात्र, हे पदपथ, सायकल मार्ग एकसलग नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सांडपाणी वाहिनीचे झाकण, पदपथावरील झाडे, विजेचे खांब, बाके, कठडा, नामफलक असे अडथळे पार करीत ये-जा करताना पादचार्‍यांना अक्षरशः अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. अनेक पदपथांवर दुकानदार, विक्रेते आणि वाहनचालकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून निर्माण केलेल्या पदपथांचा उद्देश सफल होत नसल्याचे चित्र आहे.

नव्या संकल्पनेमुळे पादचारी, सायकलस्वारांना सुरक्षित मार्ग मिळणार आहे. त्यामुळे पायी, सायकलने ये-जा करणार्‍यांची संख्या वाढणार आहे. वायू, ध्वनिप्रदूषणात घट होणार आहे ही संकल्पना मोडीत निघत असल्याचे निदर्शनास येत आहे.

कारवाईमध्ये सातत्याचा अभाव
पदपथावरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या वतीने क्षेत्रीय कार्यालयानुसार अतिक्रमण विरोधी पथक तयार केले आहे.संबंधित पथक नियमित कारवाई करीत नाही. त्यामुळे पदपथ, रस्त्यांवर अतिक्रमण वाढत आहे. कधी तरी कारवाई केली तर काही तासांत पुन्हा परिस्थिती जैसे-थे दिसून येत आहे.

आकुर्डी-चिखली मार्गावर मोठ्या प्रमाणावर रहदारी असते. परंतु या मार्गावरील पदपथ अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले आहेत. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे पादचार्‍यांसह वाहनचालकांना सुद्धा प्रवास करताना कसरत करावी लागत आहे.

पादचारी व प्रवाशांना ज्यांच्यामुळे त्रास होतो या सर्व संबंधितांवर महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात यावी. परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. भविष्यात नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. – शिवानंद चौगुले, स्थानिक नागरिक.