चार राज्यांसह एका केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुकीचा धुरळा; मोदींचं चार भाषांमध्ये ट्विट

नवी दिल्ली : देशातील तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये आज एकूण ४७५ विधानसभा जागांसाठी मतदान पार पडत आहे. तामिळनाडू आणि केरळमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार असून अण्णाद्रुमूक आणि एलडीएफ सरकारचे भवितव्य ठरणार आहे. तर दुसरीकडे आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. आसाममध्ये हा मतदानाचा शेवटचा टप्पा आहे.

तामिळनाडूत २३४ विधानसभा जागांसाठी मतदान होणार असून सहा कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यावेळी ३९९८ उमेदवारांचे भवितव्य मतदानपेटीत कैद होणार आहे. मतदानाला सुरुवात झाल्यानंतर लगेचच अभिनेता रजनीकांत यांनी मतदानाचा हक्क बजावला. याशिवाय कमल हासन आपल्या मुलींसोबत पोहोचले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत चार राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातील मतदारांना रेकॉर्डब्रेक मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. यावेळी त्यांनी खासकरुन तरुणांना विनंती केली आहे. तामिळनाडू, केरळ, आसाम, पश्चिम बंगाल आणि पुद्दुचेरीमधील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मोदींनी चार भाषांमध्ये ट्विट केले आहे.

तामिळनाडूत २३४, केरळमध्ये १४०, आसाममध्ये ४०, पश्चिम बंगालमध्ये ३१ आणि पुद्दुचेरीत ३० जागांसाठी आज मतदान होत आहे. विधानसभा निवडणुकांसोबतच मल्लपूरम आणि कन्याकुमार या दोन जागांसाठीदेखील मतदान होत आहे.

Leave a Comment