सावधान! बोगस विक्री करणे पडणार महागात; शेतकऱ्यांची बियाणांमध्ये फसवणूक करणाऱ्यांना १० वर्षांचा कारावास

मुंबई : शेतकऱ्यांना पेरणीच्या हंगामात बोगस बियाणे देऊन त्यांची फसवणूक करण्यात येत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहे. त्यामुळे या फसवणुकीच्या घटनांवर तोडगा काढण्यासाठी आता शिंदे-फडणवीस सरकराने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे बोगस बियाणे विकणाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा होणार असून, यासाठी येत्या अधिवेशनात कायदा आणला जाणार असल्याची घोषणा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे.

अकोल्यात एका दैनिकाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी ही घोषणा केली आहे.  यावेळीअब्दुल सत्तार यांनी ‘ज्यांच्याकडे बोगस बियाणे असतील, ज्यांच्याकडे बोगस औषधे असतील, किंवा खते असतील त्यांनी तत्काळ नष्ट करावे. अन्यथा राज्यपाल यांच्याकडे मी पूर्ण रिपोर्ट देणार असून, त्यांच्यावर अंतिम निर्णय झाल्यावर त्या बोगस माल विकणाऱ्यांवर किमान 10 वर्षांची शिक्षा झाली पाहिजे असा कायदा येत्या अधिवेशनात आणला जाणार आहे’ असे सत्तार म्हणाले.

शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी एक दिवस बळीराजासाठी आम्ही उपक्रम राबवला. ज्यात राज्यातील 16 हजार शासकीय कर्मचारी-अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची अडचण समजून घेतली. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत शेतकऱ्यांना कोणत्या अडचणीचा सामना करावा लागतो याचा अभ्यास केला. दरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत आम्ही खरीप हंगामाची आढावा बैठक आयोजित केली होती.

यावेळी अकोला, जालना, परभणी जिल्ह्यातील आमच्याकडे तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे आमच्या अधिकाऱ्यांनी 87 ठिकाणी छापेमारी केली, ज्यात 68 ठिकाणी अनियमितता आढळून आली. तर काही ठिकाणी आमचे अधिकारी पैसे घेत असल्याचे बातम्या आल्या. मी पोलिसांना फोन करून कारवाईत सहभागी होण्याच्या सूचना दिल्या. तसेच आमच्या कोणत्याही अधिकाऱ्याने पैसे घेतले असल्याचे आढळून आल्यास त्याची तक्रार जिल्हाधिकारी किंवा एसबीकडे करावी असेही सत्तार म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून एक प्रस्ताव राज्यपाल यांच्याकडे घेऊन जाणार आहे. पोलीस, महसूल आणि कृषी विभाग या तिघांचा दोन महिन्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आला पाहिजे. यामुळे बोगसगिरी करणारे सर्व समोर येतील. मी कृषीमंत्री किती दिवस राहिल माहित नाही. पण मंत्री असून देखील आपण काहीच केले नाहीतर शेतकरी आपल्याला माफ करणार नाही, असेही सत्तार म्हणाले.