nagar | कर्जदाराची आत्महत्या, प्रशासकावर गुन्हा दाखल करा

राहुरी,  (प्रतिनिधी):  प्रशासकाच्या जाचाला कंटाळून टाकळीमियाॅ येथील सुभाष मघाजी चोथे (वय ५५ ) या कर्जदाराने रात्रीच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली.राजमाता जिजाऊ पतसंस्थेवर प्रशासक म्हणून असलेले किरण देशमुख व निकम या अधिकाऱ्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मयत सुभाष चोथे यांचे भाऊ बाळासाहेब चोथे यांनी केली.

सुभाष चोथे ९ एप्रिलला रात्री १०.३० वाजे दरम्यान बाहेर जाऊन येतो, असे सांगून घरातून बाहेर पडले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ७.३० वाजे दरम्यान हे त्यांच्या घरापासून जवळच असलेल्या एका शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यांना तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालय नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून उपचारपूर्वीच मयत घोषित केले.

या घटनेबाबत मयत सुभाष चोथे यांचे भाऊ बाळासाहेब चोथे यांनी सांगितले की, सुभाष चोथे यांनी राहुरी येथील राजमाता जिजाऊ पतसंस्था या संस्थेकडून कर्ज घेतले होते. ते कर्ज परत भरण्यासाठी वसुली अधिकारी व प्रशासक यांनी सुभाष चोथे यांच्याकडे अनेक वेळा तगादा लावला होता. सुभाष चोथे यांनी सुमारे एक वर्षापूर्वी त्यांचे २ लाख ३५ हजार रुपये कर्ज भरले.

कर्ज भरेपर्यंत वसुली अधिकारी व प्रशासक किरण देशमुख व निकम या अधिकाऱ्यांनी तुम्ही कर्ज भरल्यानंतर तुम्हाला संस्थेचा निल दाखला दिला जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, कर्ज भरून घेतल्यानंतर याच अधिकाऱ्यांनी तुम्ही दुसऱ्या कर्जदाराला जामीन आहे, त्या कर्जदाराचे पण कर्ज भरा. त्यावेळी तुम्हाला नील दाखला देण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

चोथे यांनी वेळोवेळी अधिकाऱ्यांकडे नील दाखला मिळण्यासाठी विनवणी केली. तरीपण अधिकाऱ्यांनी त्यांना दाखला दिला नाही. कर्ज भरून देखील पतसंस्थेकडून निल दाखला मिळत नसल्याने सुभाष चोथे हे गेल्या काही दिवसांपासून चिंतेत राहत होते.

याबाबत त्यांनी नातेवाईकांना देखील सांगितले होते. राजमाता जिजाऊ पतसंस्थेवर प्रशासक म्हणून असलेले किरण देशमुख व निकम या अधिकाऱ्यांच्या जाचास कंटाळून सुभाष चोथे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मयत सुभाष चोथे यांचे भाऊ बाळासाहेब चोथे यांनी केली.