साउदम्पटन – भारतीय संघाला ज्याच्या फलंदाजीवरच सर्वात जास्त विश्वास व मदार आहे त्याच चेतेश्वर पुजाराने असे मत व्यक्त केले आहे की त्यामुळे कर्णधार विराट कोहलीचा रक्तदाब वाढण्याची शक्यता आहे.
इग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत चांगला सराव मिळाल्यामुळे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीत न्यूझीलंडचीच बाजू वरचढ राहील, असे मत पुजाराने व्यक्त केले आहे. आता यावर भारतीय संघ व्यवस्थापनाकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नसली तरीही या वक्तव्यामुळे कोहलीच्या चिंतेत भर पडली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शुक्रवारपासून या दोन संघात हा महत्त्वपूर्ण सामना होणार असून पुजारावरच परदेशात भारतीय फलंदाजीची संपूर्ण मदार असते. त्याच पुजाराने असे मत व्यक्त केल्यामुळे चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.
द वॉल राहुल द्रविड निवृत्त झाल्यानंतर त्याचा वारसदार म्हणून पुजाराकडे पाहिले जाते. त्याने परदेशात भारतीय फलंदाजीची संपूर्ण जबाबदारी समर्थपणे पेललीही आहे. मात्र, त्यानेच सामना सुरु होण्यापूर्वी शस्त्रे मॅन केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात असून संघात काही बेबनाव तर नाही ना, असेही प्रश्न चाहत्यांनी सोशल मीडियावर विचारले आहेत.
भारताच्या 9 खेळाडूंनी साउदम्पटन सोडले
इंग्लंडमधील करोनाबाबतच्या नियमांचा फटका भारताच्या नऊ क्रिकेटपटूंना बसला आहे. आयसीसीच्या नव्या नियमामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम सामन्यासाठी निवडलेल्या अंतिम संघातील खेळाडूंव्यतरिक्त अन्य खेळाडूंना साउदम्पटन सोडावे लागले आहे. या खेळाडूंना लंडनला रवाना करण्यात आले आहे.अंतिम सामन्यासाठी ज्या खेळाडूंची निवड संघात करण्यात आली आहे फक्त त्याच खेळाडूंना साउदम्पटन येथील हॉटेलमध्ये थांबता येणार आहे. आयसीसीच्या या नियमामुळे भारतीय संघातील नऊ खेळाडूंना साउदम्पटन सोडावे लागले.
भारताचे लोकेश राहुल, मयंक आग्रवाल, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, अभिमन्यू ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, अवेश खान, अर्जन नागवासवाला यांना त्यांच्या कुटुंबासह लंडन येथे पाठवण्यात आले आहे.
भारताचा संभाव्य संघ –
रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत, वृद्धिमान साहा, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, महंमद शमी, उमेश यादव, महंमद सिराज.