नगर : कचेरी झाली आता हायफाय!

कागदी टपालाला नो एन्ट्री : शासकीय कार्यालयांना “ई-ऑफिस’ सक्तीची
रवींद्र कदम
नगर – शासन दरबारी सर्वसामान्य व्यक्तींच्या कामांना वेग यावा, ते जलदगतीने पूर्ण होऊन कामांमध्ये गतिमानता येण्यासाठी राज्य सरकारच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने आता जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणाना विविध आदेश, कार्यालयानी कामकाज “ई-ऑफिस’ प्रणाली सक्तीची केली आहे. यामुळे आता जिल्हाधिकारी कार्यालयात कागदी टपाला नो ऐन्ट्री करण्यात आली असून जिल्हा प्रशासनाकडे सर्व कामे, आदेश, कार्यालयानी टपाल आता ई-मेलव्दारे करावे लागणार आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने काम आता हायफाय होणार असून कामात गतिमानता येणार आहे.

दरम्यान, सध्या जिल्हा महसूल विभाग वगळाता अन्य शासकीय विभागांनी या ई-ऑफिस प्रणालीकडे कानडोळा केला असून यामुळे जिल्हा प्रशासनाने आता त्यांना ई-ऑफिस प्रणालीसाठी डेडालाईन दिली असून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आता अन्य शासकीय कार्यालयातील टपाल जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीकारले जाणार नसून त्यांना ई- ऑफीस प्रणालीचाच वापर करावा लागणार आहे.जिल्ह्यात ई- ऑफिस प्रणालीचा वापर करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी संबंधित विभागांना 15 दिवसाचा अल्टीमेटम दिला होता.

त्याची मुदत दि.13 ऑक्‍टोबर रोजी संपली असून आजपासून सर्व शासकीय विभागांना ई- ऑफिस प्रणालीचा वापर बंधनकारक होणार आहे. जिल्ह्यामध्ये ई-आफिस प्रणाली कार्यान्वित करून त्याचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी सात प्रांत कार्यालये, तसेच 14 तहसील कार्यालयातील उपलब्ध संगणकीय साहित्याचे जिल्हा प्रशासनामार्फत सर्व्हेक्षण करण्यात आले होते. त्यासाठी पालकमंत्री विखे यांनी आवश्‍यक साधने खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 4 कोटी 41 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला.

मात्र, महसूल विभाग सोडता या प्रणालीचा वापर अन्य विभागाकडून होत नसल्याने निवासी उपजिल्हाधिकारी पाटील यांच्या आदेशानुसार अन्य शसकीय विभागातील कागदी टपाल अर्ज हे फक्त 13 ऑक्‍टोबरपर्यंत स्विकारले जातील, असे आदेश काढण्यात आले होते. त्याची मुदत आता संपली असून या पुढे जिल्हा प्रशासनासोबत अन्य विभागांना आता ई- ऑफिस प्रणालीव्दारे संपर्क साधता येणार आहे.