आरे कारशेडचा मार्ग मोकळा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उठवली कामावरील स्थगिती

मुंबई – माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पर्यावरण ऱ्हासाच्या कारणामुळे आरेमधील प्रस्तावित कारशेडच्या कामाला स्थगिती दिली होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या स्थगितीबाबत मोठा निर्णय घेत कामावरील स्थगिती उठवली आहे. त्यामुळे आता कारशेड आरेमध्येच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे अडीच वर्ष स्थगित असलेल्या कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयामुळे आरे परिसरात कारशेडच्या कामाला वेगाने सुरुवात होण्याची शक्‍यता आहे. शिंदे-फडणवीस सरकारने मेट्रो प्रकल्पाची धुरा पुन्हा एकदा अश्‍विनी भिडे यांच्याकडे सोपवली आहे. जवळपास कारशेडचे 25 टक्‍के काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. मात्र, आता नवीन वाद निर्माण होण्यापूर्वीच आरेतील मेट्रो कारशेडचे काम शक्‍यतितक्‍या जलदगतीने पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असणार आहे.

राज्यात शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात मेट्रो-3 चे कारशेड आरेमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कारशेडचे काही काम पूर्णही झाले आहे. मात्र, 2019 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच दिवशी आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली. पर्यावरणाचे नुकसान होणार असल्याचे सांगत त्यांनी आरेऐवजी कारशेड कांजूरमार्गला करण्याचा निर्णय ठाकरेंनी घेतला होता. मात्र, या जागेच्या मालकीवरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील वाद हायकोर्टात गेला आहे.

दरम्यान, राज्यात सत्तांतर होताच शिंदे-फडणवीस सरकारने मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मेट्रो-3चे कारशेड आरेमध्येच करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुढील सुनावणीच्या वेळी न्यायालयात भूमिका मांडण्याची सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाधिवक्‍त्यांना दिली आहे. त्यामुळे शिवसेना काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.