nagar | आ. आशुतोष काळेंच्याहस्ते तहसील कार्यालयात ध्वजारोहण

कोपरगाव, (प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्याचा ६५ वा स्थापना दिन व कामगार दिन कोपरगाव तालुक्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विविध शाळा, महाविद्यालय, शासकीय संस्था याठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. कोपरगाव तहसील कार्यालयात देखील आ. आशुतोष काळे यांच्याहस्ते शासकीय ध्वजारोहण मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी प्रशासकीय अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ.आशुतोष काळे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. महाराष्ट्र राज्याला ऐतिहासिक, पौराणिक, समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला असून, महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी अनेक हुतात्म्यांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले आहे. हे बलिदान सार्थ ठरविण्यासाठी महाराष्ट्र राज्याने निर्मितीपासून प्रगतीच्या शिखराकडे वाटचाल करीत असताना देशातील प्रगत राज्य, अशी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

महाराष्ट्राची उज्वल दिशेकडे वेगाने वाटचाल सुरू असून यापुढील काळातही जनतेच्या प्रगतीच्या अपेक्षा महाराष्ट्र राज्य निश्चितपणे पूर्ण करून प्रगतीची शिखरे गाठत राहील, असा आशावाद आ.आशुतोष काळे यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी ध्वजारोहण कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्यसैनिक, शासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी या सर्वांना महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाच्या आ. आशुतोष काळे यांनी शुभेच्छा दिल्या.