nagar | लोकशाही बळकटीसाठी निवडणुकीमध्ये मतदारांचे योगदान महत्त्वाचे

नगर, (प्रतिनिधी) –  आगामी लोकसभा निवडणूक ही देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून यामध्ये मतदान प्रक्रियेतील मतदार हा महत्त्वाचा घटक आहे. जिल्हा स्वीप समितीचे विविध नियोजित उपक्रम हे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निश्चितच सहाय्यभूत ठरतील.

लोकशाहीला समृद्ध करणाऱ्या मतदान प्रक्रियेतील विविध नाविन्यपूर्ण उपाययोजना देखील येत्या काळामध्ये प्रभावी ठरून निर्भयपणे व निरपेक्ष वृत्तीने मतदान करण्यासाठी मतदारांना प्रोत्साहित करणार आहेत.”असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या निर्देशानुसार अहमदनगर-शिर्डी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने नगर जिल्हा स्वीप समितीच्या वतीने मतदान जनजागृतीसाठी राबवावयाच्या विविध उपक्रमांचा आराखडा जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून नुकताच मुख्य निवडणूक अधिकारी,

महाराष्ट्र यांना सादर करण्यात आला. स्वीप म्हणजेच पद्धतशीर मतदारांचे शिक्षण आणि निवडणूक सहभाग असा अर्थ होतो. यावेळी आशिष येरेकर (मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.नगर) तसेच सर्व स्वीप समिती सदस्य उपस्थित होते.

भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील, तहसीलदार प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनातून स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारीअशोक कडूस यांच्या संकल्पनेतून स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या नियोजनातून तयार झालेल्या स्वीप आराखड्यामध्ये मतदार जनजागृतीसाठी रॅली, शोभायात्रा, मिरवणूक, सेल्फी पॉइंट, पथनाट्य, विविध प्रकारच्या स्पर्धा तसेच नव मतदार नोंदणी, दिव्यांग,

तृतीयपंथी तथा वंचित घटकातील महिलावर्ग यांच्यासाठी विशेष उपक्रम, ईव्हीएम व व्हीव्हीपॅटविषयक जनजागृती शिबिरे, मतदार जनजागृती शपथ, संकल्पपत्र, सायकल रॅली, ऑडिओ-व्हिडिओ क्लिप, मतदार जनजागृतीसाठी सोशल मीडियाचा वापर, जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद, लोकशाही दौड आदी विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. स्वीप समिती सदस्य बाळासाहेब बुगे, डॉ.अमोल बागुल यांनी स्वीप आराखडा निर्मितीसाठी परिश्रम घेतले