#videoviral : कोरोनाचे जंतू सापडले असते, तर देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबून टाकले असते

मुंबई – करोनावरील महत्त्वाचे औषध असलेले रेमडेसिविर इंजेक्‍शनचे उत्पादन ज्या कंपन्यांकडून केले जाते त्यांच्याकडे महाराष्ट्र सरकारने या औषधांची मागणी केली असता आम्हाला महाराष्ट्राला हे औषध न पुरण्याची सूचना केंद्र सरकारकडून करण्यात आल्याची धक्‍कादायक माहिती या कंपन्यांकडून मिळाली आहे, असा खळबळजनक दावा महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. खुद्द त्यांनी ट्‌विटरवरच ही माहिती दिली आहे. सध्या  रेमडेसिविर इंजेक्‍शनचे उत्पादन आणि मागणीवरून केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये शाब्दिक चकमक दिसून येत आहे.

याच मुद्यावरून शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी  बुलडाण्यात अत्यंत शेलक्या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. ते म्हणाले,’मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली आहे.

ते पुढे म्हणाले,’सध्या राज्यात नव्हे तर संपूर्ण देशभर कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. मात्र विरोधी पक्ष यावेळी मदत करायचे सोडून राजकारण करत आहे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर यांचा खरपूस समाचार घेतला.

दरम्यान, महाराष्ट्राच्याच भूमीत रेमडेसिविर तयार करणारे कारखाने आहेत. केंद्र सरकारने त्यांना तातडीने महाराष्ट्राला हे ओैषध विकण्याची अनुमती द्यावी. ही अनुमती मिळाली नाही तर अन्न आणि औषध प्रशासनातर्फे या कंपन्यांच्या साठ्यावर कारवाई करून तो साठा जप्त केला जाईल, असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे. ते म्हणाले, केंद्र सरकारकडून रितसर अनुमती मिळाली नाही तर ती औषधे जप्त करून ती जनतेत वाटण्याखेरीज आमच्यापुढे कोणताही पर्याय उरणार नाही. महाराष्ट्रात अशीच स्थिती ऑक्‍सिजनच्या बाबतीत आहे. महाराष्ट्रात चौदाशे किलो लिटर्स ऑक्‍सिजनची गरज असताना त्यातील 1250 किलो लिटर ऑक्‍सिजन आम्ही महाराष्ट्रातच तयार होतो. तरीही आम्हाला त्याचा तुटवडा भासत आहे, असे ते म्हणाले. देशातील स्टील कंपन्यांकडे मोठा ऑक्‍सिजन साठा आहे. त्यांच्याकडील हा साठा रुग्णांच्या उपचारासाठी वापरता येऊ शकतो त्याकडे ही केंद्राने लक्ष दिले पाहिजे, असे ते म्हणाले.

Leave a Comment