पुणे जिल्हा: पारगावात दाम्पत्याची आत्महत्या; दौंड तालुका झाला सुन्न

पारगाव – दौंड तालुक्‍यातील पारगाव येथील भीमा नदीपात्रात सात जणांचे हत्याकांड प्रकरण ताजे असताना गावात दाम्पत्याने आत्महत्या करीत मृत्यूला कवटाळले. या घटनेने संपूर्ण दौंड तालुका सुन्न झाला आहे. भालचंद्र ऊर्फ विकास पोपट जगताप (वय 42) व जयश्री भालचंद्र ऊर्फ विकास जगताप (वय 35), असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी की, जगताप कुटुंबीय हे मूळचे पारगावचे आहेत. विकास यांचा पारगावात दुचाकी आणि चारचाकी वॉशिंग सेंटरचा व्यवसाय आहे. तसेच ते जमीन खरेदी-विक्रीचा व्यवहार करीत होते, तर त्यांची पत्नी ही ब्युटी पार्लर चालवित होत्या. या दाम्पत्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत दोन्ही व्यवसायात चांगलाच जम बसविला होता. विकास आणि जयश्री यांचा प्रेमविवाह झाला होता. जयश्री ही विकास यांच्या मामांची मुलगी होती. आर्थिकदृष्ट्या जगताप कुटुंबीय हे सुखी होते. मात्र, नियतीच्या मनात काही दुसरेच होते.

भालचंद्र ऊर्फ विकास हे गुरुवारी (दि.9) जेवण करून झोपी गेले. शुक्रवारी (दि.10) सकाळी मुलगा यश याने आई-वडील उशीर झाला तरी उठले नसल्याने दरवाजा ठोठावला. त्यावेळी खोलीतून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे मुलाने दरवाजा तोडला असता, एका खोलीत आई जयश्री व शेजारील खोलीत वडील विकास हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.

घटनेची माहिती गावात समजताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी यवत ग्रामीण रुग्णालयात पाठविले. स्वभावाने अतिशय शांत असणाऱ्या दाम्पत्याने आत्महत्येचा निर्णय का स्वीकारला, याची चर्चा सुरू झाली. मात्र, दाम्पत्याने टोकाचा निर्णय घेत मृत्यूला कवटाळल्याने हळहळ व्यक्‍त होत आहे. पुढील तपास यवत पोलीस करीत आहेत.