पाणीपुरी खाल्ल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू, धक्कादायक घटनेने राज्यात खळबळ

नागपूर – पाणीपुरी म्हंटले कि सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते आणि आपण हमखास पाणीपुरी खातो. मात्र पाणीपुरी खाऊन नागपूर येथे एका विद्यार्थीनीचा मृत्यू झाला आहे. मिळलेल्या माहितीनुसार, मेडिकल रुग्णालयाशी संलग्नित बी. एससी. नर्सिंग महाविद्यालयातील एका विद्यार्थीनीने काही दिवसांपूर्वी पाणीपुरी खाल्ली.यानंतर काही तासांनी तिची प्रकृती बिघडली. मेडिकलमध्येच उपचारादरम्यान तिचा गुरूवारी रात्री मृत्यू झाला. या मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालातून पुढे येणार आहे.

अहवालानुसार या विद्यार्थीनीने रोज संध्याकाळी महाविद्यालयाबाहेर जाऊन पाणीपुरी खाल्ली. वसतिगृहात परतल्यावर पोट भरले असल्याचे सांगत खानावळीतील जेवण टाळले. त्यानंतर अतिसारासारखा त्रास सुरू झाला. तिने मेडिकलच्या डॉक्टरकडून उपचार घेतले. डॉक्टरांनी तिला रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. पण, तिने नकार दिला होता. मात्र, ५ जुलैला तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तिची प्रकृती आणखी खालावली व गुरुवारी रात्री तिचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे पाणीपुरीतून विषबाधा झाली का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. या मुलीसोबत पाणीपुरी खाल्लेल्या दुसऱ्या मुलीचीही प्रकृती बिघडल्याने तिलाही खबरदारी म्हणून मेडिकलमध्ये दाखल केले

पालकांना अश्रू अनावर ….
बी.एस्सी. नर्सिंगच्या प्रथम वर्षाच्या पहिल्या सत्राला प्रवेश घेतलेल्या शीतलच्या मृत्यूची माहिती कळताच तिचे आई-वडील तातडीने नागपुरात पोहोचले. मेडिकलमध्ये मुलीचा मृतदेह बघून दोघांनाही अश्रू अनावर झाले. दरम्यान, या विद्यार्थिनीचा मृतदेह जम्मू काश्मीरला नेण्याची तयारी केली जात असून त्यासाठी मेडिकल प्रशासनाकडूनही मदत केली जात असल्याची माहिती मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी दिली आहे.