Narayan Rane : लोकसभेआधी महायुतीत वादाची ठिगणी? नारायण राणेंचा उदय सामंतांवर पलटवार

Narayan Rane – मी कधी लोकसभेच्या दावेदारीवर भाष्य करतो का? युतीत नांदायचे असेल तर त्याचे पावित्र्य ठेवावे लागेल. एकदा मंगळसूत्र घातले की, त्याचे पावित्र्य जपावे लागेल, उदय सामंतांच्या लोकसभेच्या दाव्याच्या वक्तव्यावर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पलटवार केला आहे.

राणे म्हणाले की, उदय सामंत बोलतील आणि तसा निर्णय होईल, असे होणार नाही. आम्ही ओरिजनल आहोत. आम्ही पहिल्यापासून इथे आहोत. आम्ही भाजपत असलो तरी या जागेवर आमचा दावा कायम आहे. कोणता उमेदवार या जागेवरून निवडणूक लढणार ते आमचा पक्ष ठरवेल. उदय सामंत यांनी यावर भाष्य करू नये, असे मला वाटते.

महायुतीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे तिकीट मिळावे यासाठी उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत प्रयत्नशील आहेत. युतीत ही जागा शिवसेनेकडे होती. आता महायुतीत शिवसेनेच्या शिंदे गटाने या जागेवर दावा केला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच चालू आहे.

ही रस्सीखेच पाहून येथील विद्यमान खासदार विनायक राऊत म्हणाले, महायुतीतले लोक आता एकमेकांच्या उरावर बसू लागलेत. किरण सामंत या जागेसाठी मोर्चेबांधणी करत असताना त्यांचे बंधू उदय सामंत हेदेखील आपल्या भावाचं बळ वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.

महाराष्ट्रात लोकसभेचे एकूण ४८ मतदारसंघ आहेत. कोणीही, कुठल्याही जागेवर दावा करू शकतो. प्रत्येकाला तसा अधिकार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाची पार्श्वभूमी पाहता ही जागा शिवसेनेकडेच असायला हवी. या लोकसभा मतदारसंघात माझा विधानसभा मतदारसंघ आहे.

माझ्या मतदारसंघातून महायुतीला सव्वालाख मते मिळतील. बाजूच्या सिंधुदुर्गमधून म्हणजेच दिपक केसरकरांच्या मतदारसंघात आमचे मोठ मताधिक्य आहे. त्यामुळे आम्ही या जागेवर दावा केला आहे, असे सामंत यांनी म्हटले होते.

शिंदेंचा निर्णय मान्य असेल
ज्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार लढला असेल आणि तिथे उमेदवार बदलायचा असेल किंवा जिथे भाजपचा उमेदवार लढला असेल आणि तिथे आता बदल करायचा असेल, तर हे केवळ बोलण्याने होत नाही. आजही या जागेवर शिवसेनेचा अधिकार आहे, एकनाथ शिंदेंचा या जागेवर दावा आहे. त्यामुळे या जागेबाबत एकनाथ शिंदे घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल, असेही सावंत यांनी म्हटले आहे.