“योगींचे सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी”

नवी दिल्ली  – उत्तरप्रदेशात योगी सरकारने विरोधकांवर जी क्रुर दडपशाही चालवली आहे ती लोकशाही विरोधी असून योगींचे सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी राष्ट्रीय लोकदल पक्षाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांनी केली आहे.

लखीमपुर खेरीच्या हिंसाचारात नेमके काय झाले त्याचे सत्य दाबून टाकण्याचा कसोशिचा प्रयत्न योगी सरकारकडून केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. लखीमपुरला जाण्यास विरोधी पक्षाच्या नेत्यांना योगी सरकारने सगळीकडेच मज्जाव केला असला तरी जयंत चौधरी यांनी मात्र गनिमी काव्याने लखीमपुरला प्रवेश मिळवला होता.

ते म्हणाले की राज्यातील सगळीच सरकारी यंत्रणा भाजपच्या दावणीला बांधल्या सारखे काम करीत आहे. राज्यपातळीवरील अधिकारी आणि जिल्हा न्यायाधिशही भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत असा आरोप त्यांनी केला.