आता तरी कळणार का अग्निशामकचे महत्त्व

आगीत कंपनी जळून खाक ः दोन अग्निशामक बंब आले; पण आग विझविली नाही
वडगाव मावळ –
वडगाव नगरपंचायतीकडे स्वतःचे अग्निशामक दल नाही. त्यामुळे वडगाव मावळ परिसरात लागलेली आग विझविण्यासाठी इतर ठिकाणाहून अग्निशामक दलाला पाचारण करावे लागत आहे. त्यामुळे वडगाव मावळ हद्दीतील एका कंपनीला बुधवारी आग लागली त्यात ती भस्मसात झाली. त्यामुळे आता तरी वडगाव नगरपंचायतीला अग्निशामक दलाचे महत्त्व कळणार आहे का असा प्रश्‍न नागरिक करत आहेत.

वडगाव मावळ हद्दीत असलेल्या एका कंपनीला अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत कंपनी व शेकडो फळझाडे जळून खाक झाली आहेत. ही घटना बुधवारी (दि. 30) दुपारी 12.45 वाजता वडगाव नगरपंचायत हद्दीतील रघुनाथ ऊर्फ पंडित जाधव यांच्या सर्व्हे नंबर 136 अ, 7, 8, 9 व 10 मध्ये घडली. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा अग्निशमन बंब आला पण त्यांच्याकडे पाईप नसल्याने कंपनीची आग न विझविता बंब परत गेल्याचे प्रत्यक्षदर्शी रघुनाथ जाधव यांनी सांगितले. तळेगाव एमआयडीसीचा अग्निशमन बंब आला पण काही वेळातच त्यांच्या हद्दीत आग लागल्याचे सांगून निघून गेला.

या आगीत सिमेंटचे ब्लॉक बनविण्याची कंपनी जळून खाक झाली. यात सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले तर आंबा, पेरू व साग असे शेकडो झाडे जळून खाक झाली आहेत. या आगीत झालेल्या नुकसानीचा पंचनामा महसूल विभागाने केला आहे. वाढत्या आगीच्या घटनेमुळे परिसरात चिंता निर्माण झाली आहे. मावळ तालुक्‍याचे मुख्यलाय असलेल्या वडगाव नगरपंचायतीकडे अग्निशमन बंब नसल्याने तळेगाव दाभाडे व तळेगाव एमआयडीसी यांच्या अग्निशमन बंबावर अवलंबून राहावे लागत आहे.

अग्निशामक दल नसल्याने होतेय नुकसान
मागील काही दिवसांपूर्वी केशवनगर येथे फ्लॅटमध्ये आग लागली होती. परंतु अग्निशमन यंत्रणा वेळेत न आल्याने फ्लॅट जळून खाक झाला. तसेच वनक्षेत्राच्या हद्दीत वारंवार वनवे लागतात. ते वनवे विझविण्यासाठी अग्निशमन बंब वेळेत पोहचत नाही. त्यामुळे वन व वन्यजीवांची मोठी हानी होत आहे.