करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अंबाबाई, जोतिबा मंदिरात भाविक दर्शन संख्या कमी; भाविकांना ई-पासद्वारे दर्शन घेता येणार

कोल्हापूर : करोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी  राज्य सरकारकडून संपूर्ण राज्यभरात नवीन निर्बंध लागू केले आहेत. या अंतर्गत धार्मिक स्थळांच्या ठिकाणी पन्नास पेक्षा अधिक लोक एकावेळी एकत्र येऊ नयेत, याची खबरदारी म्हणून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती तर्फे भाविकांची दर्शन संख्या कमी करण्यात आली आहे. या नियमानुसार कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात भाविकांच्या दर्शनाची संख्या कमी करण्यात आली आहे.

करोनाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या कमी करण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने  घेतला. आता एका तासात 1 हजार भाविकांऐवजी केवळ 400 भाविकांना ई-पासद्वारे दर्शन घेता येणार

सोमवार दिनांक १० जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती चे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली. तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.