46 वर्षांपूर्वी प्रभात : निवडणुकीनंतरही इंदिराजी आमच्या नेत्या राहतील

निवडणुकीनंतरही इंदिराजी आमच्या नेत्या राहतील 

नवी दिल्ली, दि. 22 – इंदिरा गांधी यांची आम्ही नेत्या म्हणून निवड केलेली आहे व निवडणुकीनंतरही त्या आमच्या नेत्या म्हणूनच राहतील, असे कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष देवकांत बारुआ यांनी पत्रकारांना सांगितले.

1971 साली झालेल्या निवडणुकीपेक्षा वेगळे घडणार नाही व माझा पक्ष पुन्हा सरकार स्थापन करील. इंदिरा म्हणजेच भारत व भारत म्हणजेच इंदिरा (इंदिरा इज इंडिया ऍन्ड इंडिया इज इंदिरा) या आपल्या जुन्या वक्‍तव्याशी आपण बद्ध आहोत, असेही बारुआ म्हणाले.

निवडणुकीनंतर जनतेला संघटित करणार 

मुंबई – जनतेच्या हिताचे रक्षण करण्यासाठी लोकसभा निवडणुकीनंतर जनतेला संघटित करणार असल्याचे जयप्रकाश नारायण यांनी सांगितले. निवडून आलेले प्रतिनिधी आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे करीत आहेत अथवा नाही, हे पाहण्यासाठी कायम स्वरूपाच्या समित्या असाव्यात, असेही ते म्हणाले.

केवळ मतदान केल्यावरच लोकांवरील जबाबदारी संपत नाही. लोकप्रतिनिधी समाधानकारकपणे काम करीत आहेत किंवा नाही यावरही लक्ष ठेवण्यासाठी जनतेने संघटित राहिले पाहिजे.