पिंपरी | नाणे मावळातील विजेचे खांब धोकादायक

नाणे मावळ, (वार्ताहर) – नाणे मावळातील विजेचे खांब धोकादायक झाले असून वाकलेले खांब, तुटलेल्या तारा, रोहित्राच्या फ्युजपेट्यांची दुरवस्था, लोंबकळलेल्या तारा पहायला मिळत आहे. परिणामी नाणे मावळात गावांमध्ये अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच होणारा विजेचा लपंडाव, नादुरुस्त उपकरणांच्या दुरुस्तीकडे महावितरणने दुर्लक्ष केले आहे. त्याचा त्रास नागरिकांना होत आहे.

मावळ तालुक्याच्या नाणे मावळ परिसरात महावितरणच्या अनेक उपकरणांची दुरवस्था झाली आहे. त्याने परिसरात अनेक अपघात झाले असून नागरिकांच्या जीवाशी खेळणे महावितरणने थांबवावे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. या नादुरुस्त उपकरणांची दुरुस्ती करण्याची मागणी नाणे मावळातील ग्रामस्थ करीत आहेत. नाणे मावळ परिसरात महावितरणचे रोहित्र, डीपी फ्यूजपेट्या जीर्ण झाल्या आहेत. त्यातून तारा लोंबकळत आहेत.

या तारा एकमेकांना चिटकून वीज जाते. यामुळे घरातील अनेक उपकरणेही खराब होत आहेत. पुंडलीका व इंद्रायणी नदी काठावरील शेतकऱ्यांच्या मोटारीसाठी असलेल्या रोहित्र नादुरुस्त झाले आहेत. याबाबत तक्रारी करूनही कारवाई केली जात नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.