“आधी जरा हिंदू संस्कृती म्हणजे काय? याचा अभ्यास करा मग…”; इतिहासाचा संदर्भ देत उर्फी जावेदचे चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर

मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेदच्या सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या कमी कपड्यांतल्या वावरावरून चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहेत. उर्फी जावेद सुधारल्याशिवाय मी शांत बसणार नाही असे  त्यांनी सांगितलं आहे. त्यांना आता उर्फीने पुन्हा एकदा प्रत्युत्तर दिले आहे. तिने यावेळी चक्क हिंदू संस्कृती आणि इतिहासाशी निगडित काही गोष्टी ट्विट करत चित्रा वाघ यांना उत्तर दिले आहे.

उर्फीने चित्रा वाघ यांना उत्तर देताना ट्विट केले आहे. त्यात तिने,’एकीकडे त्यांना हिंदू राष्ट्र हवं आहे, दुसरीकडे त्यांना महिलांसाठी तालिबानी नियम लावायचे आहेत. हिंदू धर्म हा जगातला सर्वात प्राचीन धर्म आहे. हा धर्म कायमच महिलांचा आदर करत आला आहे त्यांना स्वातंत्र्य देणारा आहे. मग हे कोणत्या संस्कृतीबाबत बोलत आहेत?’ असा प्रश्न आता उर्फी जावेदने भाजपाला आणि चित्रा वाघ यांना विचारला आहे.

महिलांच्या कपड्यांबाबत तालिबानी नियम लादणाऱ्यांना हिंदू राष्ट्रही हवं आहे. पण ही यांची कुठली संस्कृती आहे? भारतीय संस्कृती ही महिलांचा आदर करणारी आणि त्यांना स्वातंत्र्य देणारी आहे. मी तुम्हाला सांगते की संस्कृतीचा भाग काय नाही? बलात्कार, डान्स बार, राजकारण्यांनी महिलांना त्यांच्या कपड्यांवरून उघड धमक्या देणं हे सगळं आपल्या भारतीय संस्कृतीचा भाग नाही असेही ट्विट उर्फी जावेदने केले आहे.

एवढेच नाही तर उर्फी जावेदने या ट्विटसोबतच स्त्रीचा प्राचीन इतिहासातला फोटोही ट्विट केला आहे. प्राचीन काळात हिंदू स्त्रिया कशा प्रकारे वस्त्रालंकार करत होत्या एकदा बघा. त्या काळातही महिलांना त्यांचे कपडे, त्यांची वस्त्रं, आभूषणं निवडण्याचा अधिकार होता. त्या महिला खेळांमध्ये, राजकारणात सहभाग घेत होत्या. त्या काळातले हिंदू हे सर्वसमावेशक होते. त्यांच्याकडून जरा भारतीय संस्कृती शिका असंही उर्फी जावेदने सुनावलं आहे.

भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ या उर्फी जावेद विरोधात आक्रमक झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांकडे उर्फीची तक्रार केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी उर्फीला नोटीस बजावली. ही नोटीस मिळाल्यानंतर आंबोली पोलीस ठाण्यात उपस्थित राहून उर्फीने तिचा जबाब नोंदवला. त्यानंतर तीन ट्विट करत हिंदू संस्कृती काय ते आधी समजून घ्या असं म्हणत चित्रा वाघ यांना टोला लगावला आहे. त्यामुळे हा संघर्ष आणखी चिघळणार हेच दिसून येतं आहे.