देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार; निवडणूक आयोगाकडून आज घोषणा

नवी दिल्ली : करोना महासाथीचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे पाच राज्यांच्या निवडणुकीची आज घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. करोनामध्ये निवडणुका होणार असल्याने निवडणूक आयोगाकडून काही निर्बंध लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य विभागासोबत केंद्रीय निवडणूक आयोगाने बैठक घेतली होती.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मागील काही दिवसांपासून निवडणूक तयारीच्या अनुषंगाने सातत्याने बैठका सुरू आहेत. निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यासह आयोगाकडून प्रचार सभा, रॅली यांच्याबाबत काही मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. मोठ्या जाहीर सभांऐवजी, लहान सभा घेण्याचे निर्देश निवडणूक आयोग देऊ शकतो.

कोविड प्रोटोकॉलचे पूर्णपणे पालन केले तरच या छोट्या रॅली काढता येतील. दोन्ही डोस लागू केलेल्या लोकांना मेळाव्यात घेण्याचे आवाहन पक्षांना करता येईल. त्याशिवाय, निवडणूक-मतदानाच्या कामात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही चिंता निवडणूक आयोगाला आहे.

कोविड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या अशा निवडणूक अधिकाऱ्यांची निवडणूक आयोग नियुक्ती करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्याशिवाय लसीकरण पूर्ण केलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे निवडणुकीची जबाबदारी असणार आहे.

मतदान केंद्रावर 1500 मतदारांऐवजी आता जास्तीत जास्त 1250 मतदारांनाच मतदान करता येणार आहे. एवढेच नाही तर उमेदवाराला अर्ज दाखल करण्यासाठी जास्तीत जास्त ५ जणांना सोबत घेता येणार आहे. त्याशिवाय घरोघरी प्रचारासाठी जास्तीत जास्त ५ जणांनाच परवानगी दिली जाऊ शकते.

निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेसोबतच निवडणूक आयोग नवीन मार्गदर्शक तत्त्वेही जाहीर करू शकतो, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे. एकदा जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे अंतिम असतील असे होणार नाही. निवडणूक आयोगाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करोनाची परिस्थिती पाहता त्यांचे फेरबदल सुरूच राहणार आहेत.