चार वर्षात चार देशांना चंद्रावर उतरण्यात अपयश; भारताने पुन्हा नव्या जोमाने हाती घेतली चंद्रमोहिम

नवी दिल्ली :  भारत जगामध्ये नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. अवघ्या काही तासांत भारताचे चांद्रयान-3  चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. रशिया आणि भारतामध्ये चंद्रावर पोहोचण्याची जणू स्पर्धाच लागली होती. मात्र, रशियाचे लुना-25 यान चंद्रावर कोसळले. त्यामुळे आता संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या चांद्रयान-3 कडे लागले आहे. दरम्यान,  गेल्या चार वर्षात चार देश चंद्रावर पोहोचण्याच अयशस्वी ठरले आहेत. मात्र तरीही भारताने नव्या जोमाने ही चांद्रयान मोहीम हाती घेतली आणि ती पूर्ण करण्यासाठी आपला देश सज्ज झाला आहे.

गेल्या चार वर्षांत चार देशांनी चंद्रमोहिम हाती घेतली, पण त्यांना चंद्रावर उतरण्यात अपयश आलं आहे. विशेष म्हणजे चंद्रमोहिमेमध्ये अपयश आल्यानंतर भारत एकमेव देश आहे, ज्याने पुन्हा नव्या जोमाने चंद्रमोहिम हाती घेतली. चांद्रयान-2 च्या अपयशानंतर चंद्रावर परतण्याचे धाडस फक्त भारतानेच केले आहे.

मागील चार वर्षात जगातील चार देशांनी चंद्रावर पोहोचण्याचा प्रयत्न केला. यामध्ये भारत, इस्रायल, जपान आणि रशिया या देशांचा समावेश आहे. भारताची चांद्रयान-2 मोहिम, इस्रायलची बेरेशीट मोहिम, जपानचं हकुटो-आर आणि रशिया लुना-25 यान चंद्रावर पोहोचण्यात अयशस्वी ठरले.  विशेष म्हणजे चारही देशाची मोहिम नेमकी चंद्रावरील लँडिंग आधी अपयशी ठरली. लँडिंगच्या अंतिम प्रक्रियेदरम्यान तांत्रिक अडचणीमुळे या मोहिमा अयशस्वी ठरल्या.

2019 मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोची चांद्रयान-2 मोहिम अयशस्वी ठरली. लँडिगआधी चांद्रयान-2 च्या लँडरचा संपर्क तुटल्याने भारताचे स्वप्न अपूर्ण राहिले. मात्र, तरीही भारत हा एकमेव देश आहे, ज्याने अपयश पचवून नव्या जोमाने तयारी केली आणि आता चंद्रावर उतरण्यापासून काही पाऊले दूर आहे.

चांद्रयान-2 च्या अपयशानंतर संकटातून धडा घेत चांद्रयान-3 मध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.  दरम्यान, आता 14 जुलै रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून चांद्रयान-3 चंद्रावर पाठवण्यात आले. आता वेगवेगळ्या टप्प्यांच्या यशानंतर चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर 23 ऑगस्टला सॉफ्ट लँडिंग करणार आहे.