विद्यार्थी केंद्रबिंदू मानून भविष्यकालीन शैक्षणिक वाटचाल – उदय सामंत

मुंबई – महाराष्ट्र शैक्षणिकदृष्ट्‌या अत्यंत प्रगत राज्य असून विद्यार्थी केंद्रबिंदू मानून, भविष्यकालीन शैक्षणिक वाटचाल असावी असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

नवीन ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020’ आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 च्या अनुषंगाने राज्याच्या दृष्टीने आवश्‍यक बदल करण्यासाठी नियुक्त केलेल्या कार्यबल गटाची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली.

बैठकीला नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या कार्यबल समितीचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 च्या कार्यबल समितीचे अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

राज्याने नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करत असताना आधीच्या आणि नवीन धोरणातील अडचणी दूर करून भविष्याचे धोरण ठरविणे आवश्‍यक आहे. धोरण ठरवित असताना उच्च व तंत्र विभागाकडून आवश्‍यक ते सर्व सहकार्य समितीला केले जाईल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले.

केंद्र सरकारने सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या 6 टक्के खर्च हा शैक्षणिक क्षेत्रावर करणार असल्याचे धोरणात सांगितले आहे. ही निश्‍चितपणे आनंदाची बाब आहे. या माध्यमातून राज्याला अधिक निधी मिळू शकतो.

राज्यानेही त्या अनुषंगाने प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. या दोन्ही समित्या आपला अहवाल तीन महिन्यात शासनाला सादर करणार आहेत. या अहवालातून राज्यासाठी जे धोरण निश्‍चित होणार आहे ते देशाला दिशादर्शक असेल, असेही सामंत यावेळी म्हणाले.

Leave a Comment