राज्यात एकीकडे उन्हाचा कडाका अन् दुसरीकडे वीजेच्या मागणीने सर्व विक्रम मोडीत काढले

मुंबई :  राज्यात एप्रिल महिन्यात उन्हाचा पारा चांगलाच शिगेला पोहचला आहे. पार ४० अंशाच्या पुढे गेल्याने सर्वांच्याच अंगाची लाहीलाही होताना दिसून येत आहे. त्यातच  दुसरीकडे राज्याच्या वीजेच्या मागणीने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. राज्यात मंगळवारी विजेच्या मागणीने उच्चांक गाठला आहे. मंगळवारी 29 हजार 116 मेगावॅट वीजेची मागणी नोंदवली गेली. एकट्या मुंबईची वीजमागणी ही 3 हजार 678 मेगावॅटवर पोहचली असल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, महावितरणच्या ग्राहकांची आजवरची सर्वाधिक वीज मागणी ही एप्रिल 2022 मध्ये 24 हजार 996 मेगावॅट नोंदवण्यात आली होती. हा आकडा आता 25 हजार 100 मेगा वॅट वीज मागणीसह मागील आठवड्यात मागे पडला होता. राज्यभरात उष्णतेची लाट पाहता मंगळवारी 18 एप्रिलला दुपारी तीनच्या दरम्यान महावितरणची वीजमागणी 25 हजार 437 मेगावॅटच्या विक्रमी स्तरावर पोहचली होती.

मुंबईची वीज मागणी ही 3678 मेगावॅटवर पोहचली आहे. त्यामुळे राज्यभरातील वीज मागणी हे 29,116 मेगावॅट पर्यंत पोहचली आहे. विना भारनियमन कुठल्याही अडथळ्याशिवाय ही वीज अखंड स्वरूपात वीज वितरण कंपन्यापर्यंत पोहोचण्याचे काम महापारेषण कंपनीने व तिथून ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे काम वीज वितरण कंपन्यांनी केले आहे. उन्हाळ्यात तापमान वाढ सर्वत्र पाहायला मिळत आहे.

देशात वातावरण सातत्याने बदलत जात आहे. कुठे उन्हाचा कडाका जाणवत आहे, तर कुठे ढगाळ वातावरण तर कुठे पाऊस पडत आहे. सध्या देशातील तापमानात कमालीची वाढ झाली आहे. बहुतांश शहारात तापमानाचा पारा हा 40 ते 44 अंश सेल्सिअसच्या आसपास गेला आहे.