नांदेड जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ; नागरी वस्त्यांमध्ये शिरले पाणी, शेती पिकांनाही मोठा फटका

नांदेड : गेल्या चार दिवसांपासून नांदेड  जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे.  कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून काल रात्रीपासून पावसाचा जोर आणखीच वाढाला आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले आहे. तसेच वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. सखल भागात पाणी साचल्यानं तसेच अनेक नागरी वस्तीत पाणी शिरल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. तसेच जिल्ह्यातील शेतीचही या पावसामुळं मोठं नुकसान झाले असल्याची माहिती समोर येत आहे.

नांदेड जिल्ह्यातील अनेक राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील पुलावरुन पुराचे पाणी वाहत असल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे. उमरी तालुक्यातील काही ठिकाणी शालेय विद्यार्थी पुराच्या पाण्यात जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडत आहेत.  दरम्यान, आज सकाळपासून नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर, उमरी, कंधार, धर्माबाद, माहूर, किनवट तालुक्‍यांसह इतर भागात पाणीच पाणी दिसत आहे. तर कंधार, हिमायतनगर, किनवट, माहूर, हदगाव या तालुक्यात मुसळधार पावसामुळे राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील नदीच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने वाहतुकीचाही खोळंबा झाला आहे. तर या मुसळधार पावसामुळे खेड्या पाड्यांना जोडणारे राज्य मार्ग, जिल्हा मार्ग, तालुका मार्ग तसेच अनेक छोटे मोठे रस्ते पाण्याखाली गेल्याने  रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत.

दरम्यान, पुराच्या पाण्याखाली गेलेल्या रस्त्यावरुन जाण्याचे नागरिक धाडस दाखवत आहे. जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी वाढल्याने, गोदावरी नदीच्याकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सकाळपासून सुरु असलेल्या या मुसळधार पावसामुळे सर्वच रस्ते जलमय झाले आहेत. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर, धर्माबाद, बिलोली, किनवट, माहूर, हिमायतनगर, उमरी, कंधार येथून नांदेडकडे जाणारे रस्ते बंद केल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.