तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून पूरग्रस्तांना 25 हजार साड्यांची मदत

तुळजापूर – तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून भाविकांनी देवीला अर्पण केलेल्या 25 हजार साड्यांची मदत पूरग्रस्त भागामधील महिलांना पाठवण्यात येणार आहे. पालकमंत्री तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी श्री. तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या समितीस महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्हयातील पूरग्रस्तांना देवीच्या 25 हजार साड्यांची मदत पाठविण्याचे आवाहन केले होते. पालकमंत्र्यांच्या या आवाहनास प्रतिसाद देत मंदीर संस्थान समितीने या 25 हजार साड्यांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

पूरग्रस्त भागातील नागरिकांना राज्यातील सर्वच भागातून मदत पाठवण्यात आली. अन्नधान्य, कपडे, जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. तुळजापूर मंदिर संस्थानकडून 10 ऑगस्ट 2021 पर्यंत शिल्लक असलेल्या एक हजार नऊवारी आणि 24 हजार सहावारी साड्यांचे नग पूरग्रस्त महिलांसाठी मदत म्हणून पाठवण्यात येणार आहेत. या सर्व साड्या रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वाटपासाठी पाठविण्यात येणार आहेत.