‘मासिक पाळी’बद्दल हेमांगी कवीने केलं मोठं विधान; ‘त्या’ पोस्टनं वेधलं सर्वांचंच लक्ष, वाचा….

मुंबई – सोशल मीडियावर नेहमीच मराठी अभिनेत्री ‘हेमांगी कवी’ आपलं मत बिनधास्तपणे मांडताना दिसते. सोशलवर तिच्या पोस्टमुळे ती नेहमीच चर्चेत असते. दरम्यान, हेमांगीला सोशलवर शेअर केलेल्या पोस्टमुळे कधी नेटकऱ्यांकडून दाद मिळते तर कधी तिच्यावर टीकाही केली जाते. असंच काहीस यावेळी देखील झालं आहे.

नुकतंच अभिनेत्रीने तिच्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली असून, सध्या ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. ज्यामध्ये तिने महिलांबाबत येणाऱ्या मासिक पाळीबद्दल भाष्य केलं आहे.

मासिक पाळीबद्दल आपल्या समाजात अनेक समज गैरसमजदेखील आहेत. अशीच एक पोस्ट सोशल मिडियावर एका महिला युजर्सने शेयर केली आहे. ज्यात तिने “मासिक पाळीच्या वेळी देवळात का जाऊ नये याची’ वैज्ञानिक कारणं सांगणाऱ्या लोकांना चांगलचं सुनावलं होतं.

मासिक पाळीच्या दिवसात काय समस्या येतात आणि देवळात गेल्याने महिलांच्या शरिरावर काय परिणाम होतो याबाबत अनेक दावे तिनं खोडून काढले होते. आता याच महिलेची ही पोस्ट हेमांगीने शेअर केली असून,

यामध्ये ती म्हणाली… “खुप महत्त्वाचं! मासिक पाळी असताना देवळात जावंसं वाटतं जा! नाही वाटत? नका जाऊ! पण मग या सगळ्यात विज्ञानाची माती करू नका!” असं अभिनेत्री म्हणाली आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट देखील केल्या आहेत.

काय आहे? महिलेची पोस्ट !

आत्ता थोड्याच वेळापूर्वी एक व्हिडिओ बघितला, इन्स्टाग्रामवर मैत्रिणीने पाठवलेला… स्त्रियांनी मासिक पाळीच्या वेळी देवळात का जाऊ नये याची ‘ वैज्ञानिक कारणं ‘ सांगणारा… का तर म्हणे आपल्या शरीरात सात का नऊ वायू असतात, पैकी मासिक पाळी वेळी अशुद्ध रक्त (इथेच आधी हाणलं पाहिजे लोकांना!) खाली ढकलणारा प्रसूती वायू कार्यरत असतो, देवळात वरच्या दिशेने जाणारे वायू असतात आणि ते एकमेकांना अडथळा करतात मग तुम्हाला शारीरिक त्रास होऊ शकतो! I mean, हद होती है यार!

म्हणजे तुम्हाला देवळात नसेल जायचं तर नका जाऊ, कोण हाताला धरून ओढून नेत नाहीत, पण या सगळ्या BS ला किमान वैज्ञानिक तरी म्हणू नका ना! बरं याला जवळपास १ मिलियन लाईक्स! आणखी अलार्मिंग गोष्ट अशी की यात आपल्या ओळखीत लाइक कोणी केलंय हे तपासलं तर, रिल पाठवणारी सोबत अजून बऱ्याच जणी होत्या, सगळ्या मुलीच!

एक आत्ता विज्ञान शाखेतून बारावी पास झालेली विद्यार्थिनी, एक microbiology मधे मास्टर्स केलेली मैत्रीण, एक बायोटेक च्या फिल्डमध्ये रिसर्च करणारी सिनियर आणि एक तर चक्क डॉक्टर! आता तर बोलणंच खुंटलं ना! अजून किती दिवस आपण आपल्या परंपरागत कुरवाळलेल्या अंधश्रद्धा वैज्ञानिक म्हणून रेटणार आहोत?

बरं माझं असंही म्हणणं नाही की लोकांनी एका अमूक विचारसरणीला फॉलो करावं! तुम्हाला जे फॉलो करावंसं वाटतं ते करा, मासिक पाळी असताना देवळात जावसं वाटतं? जा! नाही जावसं वाटत? नको जाऊ! पण या सगळ्यात विज्ञानाची माती करु नका ना किमान! तुम्हाला परंपरागत आलेलं जोखडच आता प्रिय आणि योग्य वाटतंय तर हरकत नाही, ते वागवा,

मिरवा; जसं नव्वद टक्के लोक करतातच! त्यात विज्ञानाचं validation कशाला हवं? समाजाचं आहे की! “याच्यामागे कोणतंही लॉजिक नाही पण मी लहानपणी पासून हेच शिकत आले आणि आता इतक्या वर्षांनी मला ही सवय सोडवणार नाही” हे मान्य करुन पुढे जाताच येतं की! त्याकरता प्रत्येक अतर्क्य गोष्टीशी विज्ञानाचा बादरायण संबंध लावायची काहीही गरज नाही आणि त्यातून काही सिद्धही होत नाही!

कधी कधी खूप छान वाटतं की आपल्याला मुलांना बायोलॉजी शिकवायची संधी मिळतेय, त्यांना human reproduction, menstrual cycle च्या मागचं विज्ञान शिकवता येतंय, किमान या ऐकणाऱ्या चाळीसांपैकी दहा जण तरी पुढे आयुष्यभर या गैरसमजुतींपासून फटकून राहतील याचं दरवर्षी मनोमन एक समाधान असतं… मग कधीतरी हा गैरसमजुतींनी व्यापलेला विशाल समुद्र दूरवर पसरलेला दिसतो!

आता फक्त खिन्न वाटतंय… यातून कुणीच वाचणार नाही… विज्ञानही कधीतरी यातच बुडून संपणार आहे! पण मनोमन एक खात्री आहे , स्वतःला दिलेलं वचन आहे, अगदी शेवटापर्यंत, या लोकांनी विज्ञानाला पुन्हा मंत्रतंत्राच्या जाळ्यात लोटून पार नाहीसं करेपर्यंतही म्हणू हवं तर, पण मी मात्र विज्ञानाच्या बाजूनेच राहणार आहे!