पवारांच्या घरावरील हल्ल्याचा तपास गृहमंत्री सक्षमपणे करतील – जयंत पाटील

मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला खतपाणी कुणी घातले, त्या आंदोलनात प्रक्षोभक भाषणे कुणी केली, न्यायालयाच्या निर्णयानंतर पेढे वाटणारे कोण होते, याचा शोध घेण्याची आवश्यकता व्यक्त करतानाच या प्रकरणाचा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सक्षमपणे तपास करून कडक कारवाई करतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेचे पाचवे पर्व सुरू होत असून दौर्‍यावर जाण्यापूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत शरद पवार यांच्या घरावरील हल्ला आणि मनसे-भाजपची परिस्थिती यावर भाष्य केले.

पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील अगदी खोलात जाऊन माहिती घेत असून योग्य ती कारवाई करत आहेत. पवार यांच्या घरावर झालेला भ्याड हल्ला निंदनीय आहे. त्यामुळे हा प्रकार घडवण्यामागे कोण होते हे शोधण्याची गरज आहे, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

मुंबईमध्ये मनसेला जवळ केल्यावर भाजपला किती मोठा फटका बसू शकतो याचा अंदाज त्यांना आला असेल म्हणूनच सध्या भाजपकडून मनसेचा फक्त वापर चालू आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी यावेळी लगावला.