“करोना रुग्णवाढ कायम राहिली तर राज्यात निर्बंध लागणार?”; मंत्री अस्लम शेख यांचा सावधानतेचा इशारा

मुंबई : राज्यात सध्या करोना रुग्णसंख्येत हळूहळू  वाढ होताना दिसत आहे. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मास्कचा वापर नागरिकांनी करावा असे आवाहन केल्यानंतर आता मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी करोना रुग्ण वाढल्याने राज्यात पुन्हा निर्बंध येण्याची शक्यता आहे असे म्हटले आहे.

राज्यातील करोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असताना, महाराष्ट्र सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. जर दैनंदिन प्रकरणे १ हजारच्या वर वाढली तर पुन्हा निर्बंध लादण्याची आवश्यकता असेल, असे मंत्री अस्लम शेख यांनी म्हटले आहे. मुंबईसह महाराष्ट्रात करोना रुग्ण हळूहळू वाढत आहेत. गुरुवारी, २६ मे रोजी राज्यात ५०० हून अधिक नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

मुंबईत ३०० चा टप्पा ओलांडल्याने करोना रुग्णामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने सप्टेंबर महिन्यात चौथ्या लाट येऊ शकते, असे म्हटल्यानंतर पुन्हा एकदा रुग्णवाढ पाहायला मिळत आहे. चौथ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन, महापालिकेने आधीच सांगितले आहे की त्यांच्या सर्व जंबो कोविड-१९ सुविधा किमान सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहेत.

“ज्या पद्धतीने करोना रुग्ण वाढत आहेत त्यामुळे निर्बंध आणावे लागतील. विमानसेवेमध्ये अद्याप निर्बंध कायम आहेत. लोकांनी काळजी घेतली नाही आणि रुग्णसंख्या वाढली तर निर्बंध येण्याची शक्यता नाकारता येणार नाही,” अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली.