India vs England Test Series – इंग्लंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या मालिकेतून रोहित शर्माच्या नेतृत्व शैलीची जगाला ओळख पटली. त्याने या मालिकेत ज्या प्रकारे नेतृत्व केले ते पाहून मी खूपच प्रभावीत झालो आहे, असे मत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी व्यक्त केले आहे.
रोहितच्या नेतृत्वाखाली खेळताना अगदी पहिल्या सामन्यापासून भारताने एकदाही मोठे दावे केले नाहीत. इंग्लंड कर्णधार बेन स्टोक्ससारखी आक्रमकताही दाखवली नाही. त्याने शांतपणे सर्व खेळाडूंना बरोबर घेऊन भारताला मालिकेत ४-१ असा विजय मिळवून दिला. मी एका सर्वोत्तम संघाबरोबर काम करत आहे. रोहितसोबत काम करणे एक चांगला अनुभव आहे. तो एक सर्वोत्तम कर्णधार आहे. याचमुळे खेळाडू त्याच्याकडे आकर्षित होतात, असे द्रविड म्हणाले.
ही मालिका अनेक क्षणांची साक्षीदार ठरली आहे. या मालिकेतून ऑफ-स्पिनर अश्विनचे थाटात पुनरागमन झाले. अश्विन अशा यशस्वी पुनरागमनासाठी आणि संघासाठी आपले योगदान देण्यासाठी उत्सुक होता. हे त्याने सिद्ध केले. कुलदीप यादवनेही या मालिकेत इंग्लंडच्या फलंदाजांना सातत्याने दडपणाखाली ठेवले व संघाच्या प्रत्येक विजयात मोलाटा वाटा उचलला. भारतीय संघामध्ये जे वातावरण सध्या निर्माण झाले आहे, ते महत्त्वाचे आहे. सर्व खेळाडू एकमेकांच्या खूप जवळ आहे. त्यामुळे जी सांघिक भावना निर्माण झाली, ती पाहून प्रशिक्षक म्हणून मी खूप आनंदी आहे, असेही द्रविड म्हणाले.
हुसेनचा संताप
बॅजबॉल नितीवरुन इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसेन खूपच संतापला आहे. इंग्लंडच्या फलंदाजांनी ज्या प्रकारे आपल्या विकेट फेकल्या त्याचे समर्थन होऊच शकत नाही. समोरून कीतीही फलंदाज बाद होत राहीले तरी बॅजबॉल निती सोडायची नाही हेतत्वच इंग्लंडला भोवले, असे हुसेन यांनी म्हटले आहे.