BREAKING NEWS : जीवघेणी चुरस आणि अखेर महिला हॉकीत भारताचे आव्हान कायम

टोक्‍यो – भारतीय महिला हॉकीचे आव्हान जवळपास संपुष्टात आलेले असताना भारतीय महिलांनी आज आयर्लंडविरुद्ध असा काही जिगरबाज खेळ केला की, त्यांचे स्पर्धेतले आव्हान तर कायम राहिलेच; शिवाय उद्या कदाचित त्यांच्यासाठी उपान्त्य फेरीचे दरवाजेही उघडले जाऊ शकतील.

टोक्‍यो ऑलिंपिक्‍समध्ये पुरुष हॉकी संघाची दमदार वाटचाल सुरु असताना महिला हॉकी संघाकडून फारशी अपेक्षा केली जात नव्हती. मात्र, आज आयर्लंडविरुद्ध खेळताना सामना अनिर्णित राहण्यापेक्षा भारताला विजय अनिवार्य होता. सामन्याच्या पहिल्या तीन हाफमध्ये दोन्ही संघाना एकही गोल नोंदवता आला नाही. शिवाय दोन्ही संघांना मुबलक पेनल्टी कॉर्नर्स मिळूनही त्या संधींचे गोलमध्ये रुपांतर करता आले नाही.

या सामन्यात भारताला तब्बल 14 पेनल्टी कॉर्नर्स मिळाले तर आयर्लंडला 6 पेनल्टी कॉर्नर्स मिळाले. मात्र त्याचा कशाचाही उपयोग झाला नाही.

चौथ्या हाफमध्ये कर्णधार राणी रामपालने आयर्लंडच्या गोलरक्षकाला चकवा देत साधारण 54 व्या मिनिटाला गोल केला आणि भारताला 1-0 अशी विजयी आघाडी मिळाली. त्यानंतर गोलरक्षकाविना खेळणाऱ्या आयर्लंडच्या आक्रमणाचा मुकाबला करत भारतीय महिलांनी गोल होऊ न देता आघाडी कायम राखली.

आता उद्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना भारताने जिंकला आणि ब्रिटनला आयर्लंडने हरवले नाही, तर भारतीय महिला हॉकी संघ उपांत्य फेरीत प्रवेश करु शकतो. असे झाले तर महिला हॉकीच्या इतिहासातील ती सर्वोत्तम कामगिरी असेल.