चंदीगड – हरियाणात हिंसाचार ग्रस्त नूह मध्ये हरियाणा सरकारने आज पासून 28 ऑगस्ट पर्यंत इंटरनेट सेवा आणि बल्क एसएमएस सेवा बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. येत्या सोमवारी हिंदुत्ववादी संघटनांतर्फे एक शोभा यात्रा आयोजित करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर दक्षतेचा उपाय म्हणून ही उपाययोजना करण्यात आली आहे.
सोशल मिडीयाचा वापर करून कोणी अफवा पसरवून वातावरण खराब करू नये म्हणूनही ही उपाययोजना करण्यात आली आहे. हरियाणा सरकारने याआधीही जातीय संघर्ष सुरू झाल्यानंतर नूहमधील मोबाइल इंटरनेट सेवा निलंबित केली होती.
31 जुलै रोजी विश्व हिंदू परिषदेच्या धार्मिक मिरवणुकीवर जमावाने हल्ला केल्याने नूह येथे जातीय दंगली उसळल्या होत्या. त्यात सहा जण ठार झाले आहेत. सर्व राष्ट्रीय हिंदू महापंचायतीने ही शोभा यात्रा आयोजित केली आहे. त्यावेळी काही गडबड होऊ नये यासाठी अन्यही उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
.