सीमा हैदरचे प्रकरण रिव्हर्स लव्ह जिहाद आहे का? CM योगी आदित्यनाथ म्हणाले,”हा दोन देशांशी..”

नवी दिल्ली – पाकिस्तानातील कराची येथे राहणारी सीमा हैदर पबजी गेम खेळताना नोएडाच्या सचिनच्या संपर्कात आली. दोघेही प्रेमात पडले होते. प्रेम मिळविण्यासाठी सीमा हैदरने नेपाळमार्गे भारताच्या हद्दीत अवैधरित्या प्रवेश केला आणि राबुपुरा येथे राहू लागली.हा सर्व प्रकार उजेडात येताच संपूर्ण देशभरच नाही तर पाकिस्तानात देखील सचिन आणि सीमाच्या लव्ह स्टोरीची चर्चा सुरु झाली.अशात युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील या प्रकरणाबाबत भाष्य केले आहे.

सीमा हैदर प्रकरणावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सीएम योगींना विचारण्यात आले की, सीमा हैदरचे प्रकरण रिव्हर्स लव्ह जिहादआहे का? या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, ‘हा दोन देशांशी संबंधित विषय आहे.सुरक्षा यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यांच्याकडून जो काही अहवाल येईल, त्याच्या आधारे विचार केला जाईल.

पोलिसांनी दोघांनाही अटक करून कारागृहात पाठवले. मात्र, दोन दिवसांनंतर न्यायालयाने दोघांचीही जामिनावर सुटका केली. यूपी एटीएसने सीमा आणि सचिनसह तिचे वडील नेत्रपाल यांचीही चौकशी केली होती.

सचिनच्या प्रेमापोटीच भारतात आली असून आता इथेच राहणार असल्याचे सीमाने सांगितले. नेपाळमार्गे भारतात आलेल्या सीमाला भारतीय नागरिकत्व देण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. याआधीही सीमाने स्वत:ला भारतीय समजायला सुरुवात केली आहे. सीमाने इन्स्टाग्रामवर ‘मेरा भारत महान’चा बॅज लावून, बॅकग्राऊंडमध्ये देशभक्तीपर गाणे वाजवत स्वतःचा व्हिडिओ व्हायरल केला आहे.