सभागृहाची शान आणि मान राखण्याची जबाबदारी प्रत्येक सदस्याची – उपमुख्यमंत्री पवार

मुंबई – विधिमंडळात सदस्यांनी संसदीय राजशिष्टाचार व आचारसंहितेचे पालन करावे, यासाठी आज विधिमंडळात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत याविषयी सविस्तर भूमिका मांडली. सभागृहाचे कामकाज सुरळित चालण्यासाठी विधिमंडळातील सर्वच पक्षाच्या आमदारांनी नियमांचे पालन केले पाहीजे, अशा शब्दात अजित पवार यांनी  सदस्यांचे कान टोचले.

विधिमंडळ सर्वोच्च असून इतक्या वर्षांच्या सभागृहाच्या प्रदीर्घ वाटचालीत विधिमंडळ सभागृहाने उच्च मूल्ये प्रस्थापित केली आहेत. त्यामुळे प्रत्येक आमदाराने आदर्श आचारसंहितेचे पालन करत जबाबदारीने वागले पाहीजे. विधानसभेत आमदार निवडून आल्यानंतर तो सार्वजनिक जीवनात कसा वागतो? सभागृहात कसे वर्तन करतो? यावरुन त्याची प्रतिमा ठरत असते. पण काही सदस्यांच्या चुकीच्या वर्तणुकीमुळे सभागृहाच्या प्रतिमेला तडा गेला आहे‌. आता सर्वांनीच याचा अंतर्मुख होऊन विचार केला पाहीजे, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

अजित पवार पुढे म्हणाले की, “सुरूवातीच्या काळात आम्ही निवडून आलो तेव्हा विधिमंडळ कामकाजाचे थेट प्रक्षेपण होत नव्हते. आता दोन्ही सभागृहांचे कामकाज लाईव्ह होते. राज्य आणि माध्यमे आपल्याकडे पाहात आहेत. त्यामुळे प्रत्येकाने संसदीय शिष्टाचारांचे पालन करणे आवश्यक आहे. आमदारांना दोन-दोन लाख मतदार मतदान करुन विधानसभेत पाठवत असतात. त्यांचे प्रतिनिधीत्व आमदाराने करायचे असते. कुत्रे, मांजर, कोंबड्या या प्राण्यांचे प्रतिनिधीत्व आपण करत नाही, हे सर्वांनी ध्यानात ठेवावे.”

आगामी‌ काळात आमदारांनी सभागृहात तारतम्य ठेवून बोलावे. सभागृहाची शान आणि मान राखण्याची जबाबदारी प्रत्येक सदस्याची असे आवाहन अजित पवार यांनी यावेळी केले.