काश्मीर खोऱ्यात हिंदूंच्या हत्या वाढताहेत, सुरक्षा देण्यात भाजप अपयशी – संजय राऊत

मुंबई – काश्‍मीर खोऱ्यात हिंदुंच्या हत्या वाढत आहेत त्यावरून शिवसेनेही भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. या संबंधात बोलताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे की, काश्‍मीर खोऱ्यात 1990 च्या दशकात जी स्थिती होती तशीच स्थिती आता तेथे निर्माण झाली आहे.

भारतीय जनता पक्षाने काश्‍मिरी पंडितांच्या स्थितीचे भांडवल करून मते मिळवली. पण आता त्यांना तेथे काश्‍मीरी हिंदुंचे रक्षण करण्यात अपयश आले आहे. हिंदुत्वाच्या नावाने निवडणुका लढवणाऱ्या भारतीय जनता पक्षाला काश्‍मिरातील हिंदुंचे संरक्षण करता येत नसेल तर त्या हिंदुत्वाचा उपयोग काय असा सवालही त्यांनी केला आहे. काश्‍मिरातून विस्थापित झालेल्या हिंदुंचे तेथे पुनर्वसन करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले होते. त्यासाठी त्यांनी कलम 370ही रद्द केले पण तरीही तेथील स्थितीत कोणताही फरक पडलेला नाही अशी टीकाही त्यांनी केली.

दरम्यान, ज्येष्ठ कॉंग्रेस नेते व राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीही काश्‍मिरातील हत्यांच्या प्रकरणात भाजपवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, एनडीए सरकार काश्‍मिरात शांतता प्रस्थापित करण्यात अपयशी ठरले आहे. दहशतवाद्याकंडून तेथे आपल्या नागरिकांची जी हत्या सुरू आहे ती खपवून घेता कामा नये त्यांच्या सुरक्षेची तेथे तातडीने उपाययोजना केली जावी, अशी मागणीही त्यांनी केली.