Kumaraswamy : “महाराष्ट्रात जे घडलं ते कर्नाटकात घडू शकतं, काँग्रेसचे ५० ते ६० आमदार…”; कुमारस्वामी यांच्या दाव्याने मोठी खळबळ

Kumaraswamy :  महाराष्ट्रात मागच्या वर्षी मोठे बंड घडून आले होते त्यावेळी शिवसेनेच्या आमदारांनी पक्षाला रामराम करत  भाजपसोबत हातमिळवणी केली आणि सत्तेच्या चाव्या आपल्या हाती घेतल्या. दरम्यान, महाराष्ट्रातील या राजकीय घडामोडीची आता आणखी एका राज्यात पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.जनता दल (सेक्युलर) चे नेते आणि माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी सत्ताधारी काँग्रेस पक्षातले ५० ते ६० आमदार फुटून भाजपात जाऊ शकतात आणि महाराष्ट्रात घडलं तसं सत्ता परिवर्तन कर्नाटकात घडू शकतं असा दावा केला आहे.

कर्नाटकात सत्ताबदल होऊन राज्यात काँग्रेसचे राज्य स्थापन झाले. दरम्यान, राज्यातील सरकार कधीही कोसळू शकते असा दावा माजी मुख्यामंत्री कुमारस्वामी यांनी केला आहे. याविषयी बोलताना, “काँग्रेस पक्षातले एक प्रभावशाली मंत्री आहेत ज्यांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईपासून वाचायचं आहे. त्यामुळे ते आणि त्यांच्यासह ५० ते ६० आमदार हे भाजपात जातील असा दावा केला आहे. सध्या त्या बड्या नेत्याची भाजपाशी चर्चा सुरु आहे” असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

पुढे बोलताना,”कर्नाटकच्या काँग्रेस सरकारमध्ये सारं काही आलबेल नाही. कर्नाटकचं सरकार कधीही कोसळू शकतं. काँग्रेसमध्ये मोठा प्रभाव असलेले एक मंत्री भाजपात जाऊ शकतात. केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी ते हे पाऊल उचलतील आणि त्यानंतर कर्नाटकचं सरकार कोसळेल असा मोठा दावा कुमारस्वामी यांनी केला आहे. त्या बड्या नेत्यावर असे आरोप आहेत की त्यातून वाचणं जवळपास कठीण आहे. त्यामुळे ते लवकरच भाजपाची वाट धरु शकतात. त्यांच्यासह ५० ते ६० आमदार जातील असा धक्कादायक दावा कुमारस्वामी यांनी केला आहे.

एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना कुमारस्वामी यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांना जेव्हा हा बडा नेता कोण? नाव सांगा हे विचारलं असता ते म्हणाले छोट्या नेत्यांकडून फोडाफोडी होत नाही. ही गोष्ट फक्त ज्यांचा प्रभाव जास्त प्रमाणात आहे तेच करु शकतात. एक बडा नेता आहे ज्याची भाजपाशी बोलणी सुरु आहेत. त्या नेत्यासह ५० ते ६० आमदार भाजपात जातील. महाराष्ट्रात जसे एकनाथ शिंदे यांनी केले आणि त्यानंतर तिथे जसे सत्तांतर झाले तशीच परिस्थिती कर्नाटकातही उद्भवू शकते. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कर्नाटकात कधीही काहीही घडू शकते, असे म्हणत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.