दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले,’योगीजी, तुमचा खरा शत्रू भाजपमध्येच…’

Lok Sabha Election 2024 । दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे.  त्यासोबत केजरीवाल यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही टीका केली. अरविंद केजरीवाल म्हणाले की,’योगीजी दिल्लीत आले होते आणि त्यांनी मला खूप शिवीगाळ केली, पण त्यांचा खरा शत्रू भाजपमध्येच आहे.’ असेही ते म्हणाले.

अरविंद केजरीवाल यांनी दावा केला की,’पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावरून हटवायचे आहे. त्यामुळे योगींनी आमच्यावर टीका करू नये.’

अरविंद केजरीवाल यांनी अमित शहांवरही निशाणा साधला. ते म्हणाले,’काल अमित शहा जी दिल्लीत आले आणि त्यांच्या जाहीर सभेत 500 पेक्षा कमी लोक उपस्थित होते. दिल्लीत आल्यानंतर त्यांनी देशातील जनतेला शिव्या देण्यास सुरुवात केली.आम आदमी पार्टीचे समर्थक पाकिस्तानी असल्याचे सांगितले. मला त्यांना विचारायचे आहे की, दिल्लीच्या जनतेने आम्हाला ६२ जागा देऊन, ५६% मते देऊन आमचे सरकार बनवले, पंजाबच्या जनतेने आम्हाला ११७ जागांपैकी ९२ जागा दिल्या, तर मग पंजाबी पाकिस्तानी आहेत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

‘गुजरात, गोवा, उत्तर प्रदेश, आसाम, मध्य प्रदेश आणि देशातील अनेक भागांतील लोकांनी आम्हाला प्रेम आणि विश्वास दिला, या देशातील सर्व लोक पाकिस्तानी आहेत का ? तुम्हाला याचा इतका अभिमान आहे की तुम्ही लोकांना शिवीगाळ आणि धमक्या देण्यास सुरुवात करता. तुम्ही अजून पंतप्रधान झाले नाहीत आणि इतके अहंकारी झाला आहात. तुमच्या माहितीसाठी, मी तुम्हाला सांगतो की तुम्ही पंतप्रधान होत नाही, कारण लोक 4 जूनला भाजपचे सरकार बनवणार नाही.’ असेही ते म्हणाले आहे.