नगर | देशात स्थिर सरकारसाठी पुन्हा एकदा मोदी सरकार : ॲड. आगरकर

नगर, (प्रतिनिधी) – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १० वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. या कार्यकाळात अनेक चांगले निर्णय भाजप सरकारने घेतले. देशात स्थिरता व स्थिर सरकारची आवश्यकता आहे. यासाठी भाजप दिवार लिखो अभियान राबवित असून, देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असल्याचे, प्रतिपादन भाजप शहर जिल्हाध्यक्ष ॲड. अभय आगरकर यांनी केले.

भाजपच्या वतीने केडगाव मंडळ येथे दिवार लिखो अभियानाचा प्रारंभ शहर जिल्हाध्यक्ष ॲड. अभय आगरकर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी केडगाव मंडळाचे अध्यक्ष नीलेश सातपुते, राजू सातपुते, सुजय मोहिते, अजित कोतकर, विशाल मरकड, विशाल कर्डिले, कार्तिक तगारे आदी उपस्थित होते.

ॲड. आगरकर म्हणाले की, देशात विकासाची गंगा आता वाहू लागली असून, सर्व जातीधर्मांना बरोबर घेऊन आम्ही विकासाकडे घेऊन जात आहोत. नागरिक व महिलांना नजरेसमोर ठेवून भाजपाच्या वतीने विविध अभियान राबविण्यात येत असून, गाव चलो अभियान, बूथ चलो अभियान यांना चांगला प्रतिसाद मिळाला, असे सांगितले.

नीलेश सातपुते म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘गाव चलो अभियान, बूथ चलो अभियान’ मोठ्या उत्साहात राबविले जात आहे. त्याचबरोबर दिवार लिखो अभियान राबविले जात असून, त्याचा शुभारंभ केडगाव मंडळ येथे भाजप शहर जिल्हाध्यक्ष ॲड. अभय आगरकर यांच्या हस्ते करण्यात आला. केडगाव मंडळामध्ये ५० भिंतीवर हे अभियान राबविले जाईल, असे ते म्हणाले.