कोलकाता – नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएचे सरकार फार दिवस चालणार नाही असा दावा तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते नाखुष आणि अस्वस्थ आहेत. त्यामुळे भाजपचे नेतेच पक्ष सोडतील. त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही असे ममता म्हणाल्या.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्याचे आपल्याला आमंत्रण मिळाले नाही आणि आपण त्यात सहभागीही होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
देशात परिवर्तनाची गरज आहे व प्रत्येक राजकीय घडामोडीवर आपले लक्ष आहे. ज्या प्रकारचा जनादेश आला आहे त्यानुसार मोदी यांनी पंतप्रधान व्हायला नको. इंडिया आघाडीने आज सरकार स्थापन करण्यासाठी दावा केला नाही याचा अर्थ आम्ही नंतर तसे करणार नाही असे नाही.
तसेच भारतीय जनता पार्टीला नागरिकत्व दुरूस्ती कायदा अर्थात सीएए रद्द करावाच लागेल. आम्ही संसदेतही हा मुद्दा उपस्थित करू असे त्यांनी सांगितले.