‘निरंजन डावखरेंनी मुस्लिम भगिनीशी विवाह केला’; लव्ह जिहादच्या बॅनरवरुन आव्हाडांची टीका

मुंबई – श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर लव्ह जिहादविरोधी कायदा आणण्यासाठी मागणी केली जात आहे. याशिवाय लवकरात लवकर आरोपी आफताबला फाशी देण्याची देखील मागणी केली जात आहे. लव्ह जिहाद धर्मांतर आणि लँड जिहादविरोधी कायदा पूर्ण देशभर लागू करण्याकरता अॅड.निरंजन डावखरे यांनी हिंदू जनजागरण धर्मसभेचे आयोजन केले आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद आव्हाड यांनी अॅड.निरंजन डावखरे यांच्यावर टीका केली आहे.

यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत लिहिले की, “आफताब आणि श्रद्धा वालकर या प्रकरणामध्ये शंभर टक्के आफताबला फाशी झालीच पाहीजे. पण, आफताब या नावाखाली गैरसमज पसरवणा-यांना मला एवढेच सांगायचे आहे की, आफताब हा पारसी आहे. ज्या उद्देशाने त्याचे नाव घेतले जाते, तो उद्देश हिनमनोवृत्ती दाखवणारा आहे. तसेच जर कुठेही लव्ह जिहाद सारखी प्रकरणं असतील तर आम्ही तुमच्याबरोबर उभे राहू. मला नाही वाटत ठाण्यात एकही प्रकरण लव्ह जिहादचे झाले आहे.”

“शिव, फुले, शाहू,आंबेडकर ह्यांच्या महाराष्ट्रात कुठल्या ही महिला भगिनीला होणारा त्रास कसा काय आम्ही सहन करू. पोलीसांकडे त्याबाबत काही नोंद आहे असे देखील वाटत नाही. असेल तर पोलीसांनी तसे सांगावे. पण, निष्कारण त्यावरुन ठाण्यामध्ये तणाव निर्माण करणं हे काही योग्य आहे असे वाटत नाही. कुठलेतरी कारण काढून धार्मिक तेढ निर्माण करुन अशांतता पसरवणं ही मानसिक विकृती आहे आणि त्यामध्ये संपूर्ण देशाचे नुकसान होते.”

यासोबतच त्यांनी एका पोस्टरचा फोटो शेअर केला आहे. याबाबत त्यांनी लिहिले की, “ठाण्यात काही पोस्टर्स लागली आहेत. ती पोस्टर्स वाचल्यानंतर असे वाटते की, हिंदू धर्मातील महिला भगिनींना सद्सदविवेक बुद्धीच नाही आणि त्या कधिही जाळ्यात फसू शकतात. मला यामध्ये कुठेही सत्यता वाटत नाही. माझ्या हिंदू भगिनी अत्यंत हुशार आहेत. त्यांची सद्सदविवेक बुद्धी जागृत आहे आणि आपल्या आयुष्याचं पुढे काय करायचं हा निकाल घेण्यासाठी त्या खूप समर्थ आहेत.”

“त्यांच्या सामर्थ्याला कमी लेखू नका आणि ही पुरुषप्रधान संस्कृती त्यांच्यावर लादू नका. जगातील सर्व धर्मातील महिला या शंभर वर्षांपूर्वी कश्या होत्या आणि शंभर वर्षांनंतर कश्या आहेत हे आपण जाणून आहोत. तेव्हा कुठल्याही वर्णाला, कुठल्याही वर्गाला तसेच स्त्री-पुरुषामध्ये भेदभाव न करता आपण सगळे सामान आहोत आणि बुद्धीजीवी आहोत एवढं लक्षात ठेवा. निरंजन डावखरे यांनी एका मुस्लिम भगिनीशी विवाह केला आहे हे सामंजस्य वाढीला लागावे हीच इच्छा आहे. हा कार्यक्रम  नवपाड्यात न घेता डायघरला का घेतला जात आहे. हा प्रश्न अद्याप सुटत नाही, “असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी व्यक्त केला.