राज ठाकरेंविरोधात ‘त्या’ प्रकरणी अजामीनपात्र वॉरंट

मुंबई :  मशिदींवरील भोंग्यांविरोधात  कडक भूमिका घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.  २००८ मध्ये राज ठाकरेंच्या अटकेनंतर झालेल्या आंदोलनप्रकरणी हे वॉरंट काढण्यात आले असल्याचे सांगण्यात येत  आहे. सांगलीमधील शिराळा न्यायालयाने हे अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे.

६ एप्रिलला हे वॉरंट जारी करण्यात आले आहे. एक महिना उलटल्यानंतरही पोलिसांनी यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. शिराळा न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की,“सर्वोच्च न्यायालयाने पाच ते दहा वर्षांपूर्वीची प्रलंबित प्रकरणं निकाली काढण्याचे आदेश आहेत. त्यानुसार हे प्रकरण निकाली काढण्यासाठी अजामीनपात्र वॉरंट पाठवले आहे”.

राज ठाकरेंनी भोंग्यासंबंधी अल्टिमेटम दिला असून बुधवारी संपूर्ण राज्यभरात आंदोलन होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत आज बैठक होणार आहे. या बैठकीत राज ठाकरेंविरोधातील या अजामीनपात्र वॉरंटंसंबधीही चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, २००८ मध्ये रेल्वे भरतीत स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य द्या या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनात कल्याण कोर्टाच्या आदेशाने राज ठाकरेवर अटकेची कारवाई झाली होती. या अटकेच्या निषेधार्थ शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी गावात मनसे कार्यकर्त्यांनी बंद पुकारला आणि जबरदस्तीने दुकाने बंद करण्यास दुकानदारांना भाग पाडले होते. विनापरवाना बंद पुकारल्यामुळे शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी शिराळा प्रथमवर्ग न्यायालयात राज ठाकरे यांच्यासह १० मनसे कार्यकर्त्यांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.