कोचिंग क्लासवालेच काॅलेज चालवतात : मंत्री विखे पाटील यांची खंत

कोपरगाव – शिक्षणाच्या पवित्र मंदिरातून देशाची भावी पिढी निर्माण होते. त्याच पवित्र शिक्षण मंदिरात खासगी कोचिंग क्लासेसवाल्यांनी धुमाकूळ घातला आहे. सध्या कोचिंग क्लासवालेच काॅलेज चालवतात, अशी खंत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. कोपरगाव तालुक्यातील विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी एका कार्यक्रमात मंत्री विखेंनी राज्यातील शिक्षण व्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले की, सध्या शिक्षणाचा बाजार झाला आहे. आज-काल परीक्षांना सुद्धा महत्त्व राहिले नाही. कोचिंग क्लासेसवाल्यांनी शिक्षण यंत्रणेचा ताबा घेतला आहे. बऱ्याच ठिकाणी खासगी कोचिंग क्लासेसवाल्यांनी ५० टक्के नफ्यावर काॅलेज चालवायला घेतले आहेत. काॅलेज चालवण्यासाठी कोचिंग क्लासेसने फिफ्टी फिफ्टीचा फाॅर्म्युला सुरू केला ही दुर्दैवी बाब आहे, अशी खंत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

विखे पाटील यांच्या सर्वाधिक शिक्षण संस्था राज्यात व जिल्ह्यात आहेत. शिक्षण यंत्रणेतील सर्व बारकावे विखे पाटील यांना माहिती आहेत. शिक्षण क्षेत्रात खासगी कोचिंग क्लासेसवाले पालकांसह संबंधित संस्थांना आपल्या जाळ्यात ओढून आपली झोळी भरून गडगंज होत आहेत. यावर प्रशासनाने वेळीच लक्ष घालणे गरजेचे आहे. जिथे महसूलमंञी म्हणतात की, सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांना इतके महत्त्व राहिले नाही तर मग शिक्षण क्षेञात किती अंदाधुंद कारभार सुरू असेल.

सर्वसामान्य नागरिकांच्या मुलांना सहजासहजी कमी पैशात खरंच दर्जेदार शिक्षणाचा लाभ होत असेल का? जिथे ५० टक्के फॉर्म्युल्यावर काॅलेज चालत असतील, त्या काॅलेजचा दर्जा व गुणवत्ता कशी असणार? अशा शिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी धोक्याच्या असून, पालकांच्या भावनांशी खेळ खेळणाऱ्या आहेत, असे मंत्री विखे म्हणाले.