नगर |अन्यथा कायदेशीर मार्गाने रेल्वे प्रशासनाविरुद्ध लढू

श्रीरामपूर, (प्रतिनिधी)– वनविभाग व खासगी मालमत्ताधारक यांच्याकडील जागा रेल्वे विभागाची असल्याचे सिद्ध करावे, तोपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, अन्यथा कायदेशीर मार्गाने रेल्वे प्रशासनाविरुद्ध कार्यवाही केली जाईल, असा इशारा खा.डॉ. सुजय विखे यांनी दिला.

रेल्वेलाईनच्या विस्तारामुळे व मालधक्क्याच्या प्रस्तावित स्थलांतरामुळे विस्थापित होऊ पाहणाऱ्या नागरिकांवर अन्याय होऊ नये म्हणून खा.सुजय विखेंच्या पुढाकाराने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, रेल्वेचे केंद्र तसेच सोलापूर विभागाचे अधिकारी, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, वनविभागाचे अधिकारी यांचेसोबत भाजप तालुकाध्यक्ष दीपक पटारे, विधानसभा समन्वयक नितीन दिनकर यांच्या प्रयत्नाने भाजपचे केतन खोरे, शहराध्यक्ष मारूती बिंगले, कामगार नेते नागेश सावंत, आपचे तिलक डुंगरवाल, संजय गांगड यांची ॲानलाईन बैठक पार पडली.

ॲानलाईन बैठकीत दिल्ली येथून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व खा.सुजय विखे पाटील उपस्थित होते. खा.विखे पाटील म्हणाले की, रेल्वे विभागाच्या नोटिसीमुळे श्रीरामपूरातील नागरीक भयभीत झाले होते. ही कारवाई झाल्यास शेकडो नागरिकांची घरे व दुकाने उद्ध्वस्त होण्याची भिती होती. येथील नागरिकांनी महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतल्याने आपण या प्रकणात लक्ष घातले.

रेल्वे विभागाने मालधक्याच्या जागेचे पुरावे जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करावेत, त्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारची संबंधित विभागाची कमिटी तयार करावी तसेच वनविभाग व खासगी मालमत्ताधारक यांच्याकडील जागा रेल्वे विभागाची असल्याचे सिद्ध करावे, तोपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, अन्यथा कायदेशीर मार्गाने रेल्वे प्रशासनाविरुद्ध कार्यवाही केली जाईल, असा इशारा खा.विखेंनी दिला.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, खा.सुजय विखे पाटील यांनी मांडलेली बाजू योग्य असून रेल्वे प्रशासनाने जागेची शहानिशा करून कोणीही विस्थापित होणार नाही याची काळजी घ्यावी. वन विभाग, महसूल व रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांची कमिटी स्थापन करण्याचे आदेश देत या कमिटीचा अहवाल येईपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, अशा सूचना रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

याॲानलाईन बैठकीसाठी खा.सुजय विखे पाटील यांचेकडे भाजप तालुकाध्यक्ष दीपक पटारे, विधानसभा समन्वयक नितीन दिनकर यांनी पाठपुरावा केला. बैठकीत भाजपचे केतन खोरे, संजय गांगड यांनी दत्तनगर हद्द संगमनेर रोड ते ओव्हर ब्रीज नेवासा रोड येथील विस्थापित होऊ शकणाऱ्या नागरिकांच्या बाजूने ठोस भमिका मांडली. यावेळी विकास डेंगळे, प्रसाद कटके, युवराज घोरपडे, योगेश जाधव, गणेश भडांगे, सुभाष भडांगे, भागवत घुगे, मुबारक शेख, आलिम शेख, हरिश काळे, सुरेंद्र विखे आदी उपस्थित होते.

विखे पिता-पुत्र धावले श्रीरामपूरकरांच्या मदतीला…!
रेल्वे प्रशासनाची कारवाई न टाळता येणारी असल्याचे बोलले जात होते. मात्र, केंद्र व राज्य सरकारमध्ये दबदबा असलेल्या महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पा. व खा.सुजय विखे पा. यांनी स्वतः लक्ष घालत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, रेल्वे प्रशासन, वनविभाग, महसूल विभागात यशस्वी मध्यस्थी करत रेल्वे लाईनच्या रहिवासी, व्यापाऱ्यांवरील कारवाईची टांगती तलवार दूर केल्याने नागरीकांनी विखे पिता-पुत्रांचे आभार मानले.