“फोनवर आमच्या शहर अध्यक्षा म्हणाल्या, ताई आम्ही जिवंत राहणार नाही”; रोहिणी खडसेंचा शिवसेनेच्या आमदारांवर गंभीर आरोप

मुंबई : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी  एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले आहे. असे असले तरी जळगावमध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये  चांगलेच खटके उडत असल्याचे दिसून येत आहे. जळगावमध्ये शनिवारी मध्यरात्री झालेल्या धक्कादायक प्रकारावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांनी स्थानिक शिवसेना आमदारांवर गंभीर आरोप केले आहेत.

जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहर अध्यक्षांचा शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी विनयभंग केल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे. “काल रात्री साडेदहाच्या सुमारास राष्ट्रवादीच्या मुक्ताईनगर शहराच्या शहर अध्यक्ष नीताताई यांचा मला फोन आला की काही गावगुंड त्यांच्या घराच्या जवळ जाऊन त्यांचा दरवाजा ठोकत आहेत, त्यांना बाहेर ओढत आहेत. अश्लील शिवीगाळ करत आहेत. त्यांनी विनंती केली की ताई तुम्ही तात्काळ इथे या नाहीतर आम्ही जिवंत राहणार नाही. मी जेव्हा त्यांच्या घराजवळ गेले, तेव्हा ते १० ते १५ लोकं पळून गेले”, असे रोहिणी खडसे म्हणाल्या आहेत.

दरम्यान, या गावगुंडांनी आपण चंदूभाऊंचे (चंद्रकांत पाटील) कार्यकर्ते असल्याचे सांगितल्याचे  देखील रोहिणी खडसे म्हणाल्या. “शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील आणि इश्वर फाटकर या दोघांना आम्ही पकडू शकलो. त्यांची वागणूक चुकीची होती. मी तिथे असताना माझ्या समोर देखील त्या महिलेला अश्लील शिवीगाळ करणं सुरू ठेवलं होतं. मी त्यांना समजावलं, तेव्हा ते माझ्याही अंगावर धावून आले. मलाही त्यांनी सांगितलं की आम्ही चंदूभाऊंचे कार्यकर्ते आहोत. जर त्यांच्याविरोधात पोस्ट टाकली, तर आम्ही काय आहोत, हे शिवसेना स्टाईलने दाखवून देऊ. तेव्हा पोलीस आले. हा प्रकार पोलिसांच्या समोर घडला आहे”, असा दावा रोहिणी खडसे यांनी केला आहे.

“माता भगिनींबाबत असा प्रकार कुणी करत असेल, तर आम्ही कुणीही ते सहन करणार नाही. शिवसेनेचे कार्यकर्ते, चंद्रकांत पाटलांचे पदाधिकारी आहे, त्यांना जर आमदारांनी आवर घातला नाही, समजूत घातली नाही, तर आम्ही शेवटी सगळ्यांना चोप देऊ”, असं देखील त्या म्हणाल्या.