रेल्वेद्वारे ऑक्‍सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी

मुंबई  -महाराष्ट्रातील ऑक्‍सिजनची मागणी आणि त्याची उपलब्धता पाहता अन्य राज्यांकडून रेल्वेद्वारे ऑक्‍सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी. राज्यातील औषध उत्पादक कंपन्यांना रेमडेसिवीर तयार करण्यास मान्यता द्यावी, राज्यात दररोज 8 लाख लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले असून त्यासाठी लसींचा पुरवठा व्हावा, आदी मागण्या राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केल्या. 

महाराष्ट्रातील परिस्थितीविषयी माहिती देताना आरोग्यमंत्री टोपे यांनी ऑक्‍सिजन आणि रेमडेसिवीरचा तुटवडा, लसीकरण, विषाणूचा बदलता गुणधर्म याबाबत चर्चा केली.
रस्त्यावरून जाणारी ऑक्‍सिजनची वाहने अडवणार नाही.

महाराष्ट्रातील ऑक्‍सिजन तुटवडा लक्षात घेता अन्य राज्यांतून महाराष्ट्राकडे ऑक्‍सिजन घेऊन जाणारी वाहने अडविली जाणार नाहीत याची खबरदारी घेण्याची सूचना राज्यांना दिली आहे. हवेतून ऑक्‍सिजन शोषून तो रुग्णांना देणाऱ्या यंत्रांचे वाटप केंद्र शासनाच्या माध्यमातून केले जाणार आहे. देशभरात 132 प्लांट देण्यात येणार असून महाराष्ट्रातील स्थिती लक्षता घेता त्यातील जास्तीत जास्त प्लांट महाराष्ट्राला मिळावेत अशी मागणी करण्यात आली आहे.

रेमडेसिवीर तुटवड्यामुळे राज्यातील स्थानिक औषध उत्पादक कंपन्यांना त्याच्या उत्पादनासाठी तांत्रिक सहकार्य आणि परवानगी देण्यासाठी विधी व न्याय विभागाशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

रेमडेसिविवरील निर्यात बंदीमुळे 15 कंपन्यांचा जो साठा शिल्लक आहे त्यातील जास्तीत जास्त महाराष्ट्राला मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. करोना विषाणूची जनुकीय संरचना बदलली का याच्या तपासणीसाठी महाराष्ट्रातील काही नमुने पाठविण्यात आले आहे. त्यातील 1100 पैकी 500 नमुन्यांची तपासणी झाली असून त्याविषयी सविस्तर अहवाल केंद्र शासनाकडून दिला जाणार आहे. सर्वात जास्त संसर्ग करण्याची क्षमता या विषाणूत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मात्र याविषयी सविस्तर माहिती संशोधनाअंती दिली जाणार आहे, असे टोपे यांनी सांगितले.

Leave a Comment